ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, मोदी सरकारने आता महिलांना सिंदूर भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. ते ९ जूनपासून सुरू होईल आणि प्रत्येक घरात सिंदूर पोहोचवले जाईल. ही मोहीम एक महिना चालेल. ९ जूनपासून ही मोहीम राबवली जाणार असून भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन महिलांना सिंदूर वाटतील. काही लोक या मोहिमेचं स्वागत करत आहेत, तर काहीजण यावर टीका करत आहेत. अशातच प्रसिद्ध गायिका नेहा सिंह राठोडने याबद्दल मोदी सरकारवर टीका केली आहे.

नेहाने याबद्दलचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “ऑपरेशन सिंदूरमध्ये शूरता दाखवल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने निर्णय घेतला आहे की, ते आता घरोघरी सिंदूर पोहोचवणार आहेत. हसू नका ही अगदी पक्की बातमी आहे. पाकिस्तानासमोर सरकारने त्यांची वीरता जर दाखवली असती, तर त्यांनी घरोघरी जाऊन सिंदूरबरोबरच टिकळी, अंगठी, मेहंदी, नेलपॉलिश, बांगड्या आणि कंगवादेखील वाटले असते.”

यापुढे नेहाने सांगितलं की, “या सिंदूरच्या डब्ब्यांवर फोटो कुणाचा असेल? कदाचित त्यांचा (नरेंद्र मोदी) तर नसेल ना? त्यामुळे मी बिहार आणि देशातील सर्व महिलांना सूचना देऊ इच्छिते की, हे लोक जेव्हा हे सिंदूर घेऊन येतील तेव्हा तुम्ही बाहेर पडू नका. कारण विचार करा… या लोकांचं हेब वर्तन ठीक नाही. त्यामुळे बंद दरवाजाअडूनच त्यांना सांगा की, स्वत:च्या नवऱ्याच्या नावाचं सिंदूर लावलं जातं, कोणत्याही परपुरुषाकडून ते घेतलं जात नाही.”

यापुढे तिने टीका करत असं म्हटलं, “बिहारच्या निवडणूका जवळ आल्याने भाजप आता बिहारच्या महिलांचं भावनिक शोषण करतील. बिहारचे कोरोडो पुरुष रोजगारासाठी ट्रेननधून देशातल्या विविध भागांत जातात आणि त्यांच्या पत्नी नवऱ्याच्या नावाचं सिंदूर त्यांच्या कपाळांवर लावतात. कारण बिहारमध्ये रोजगार नाही. जर रोजगार असता तर त्या महिलांच्या नवऱ्यांना बाहेर जावे लागले नसते.”

यापुढे नेहा आवाहन करत म्हणाली, “बिहारमधील स्त्रियांच्या मनात रोजगाराचा प्रश्न येऊ नये आणि या सगळ्यापासून त्या दूर राहाव्यात म्हणून सरकार हे सिंदूर वाटप करून त्यांचं मन भरकटवत आहेत. हे अभियान म्हणजे सरकारच्या अश्लीलतेची पराकाष्टा आहे आणि देशवासियांना याचा विरोध केला पाहिजे. अशा प्रकारची सरकारी मोहीम म्हणजे महिलांचा सामूहिक अपमान आहे.”

दरम्यान, नेहाने याआधी अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अनेकदा तिने सरकारच्या विविध धोरणांवर टीकाही केली आहे. यांसाठी तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अशातच आता तिने नवा व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावर नेटकऱ्यांनीही विविध कमेंट्स केल्या आहेत.