Tharala Tar Mag Fame Actor Amit Bhanushali : ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. यामध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची जोडी अर्जुन-सायलीची मुख्य भूमिका साकारत आहे. गेल्या अडीच वर्षांत अमित घराघरांत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्याने मालिकेत साकारलेली अर्जुन सुभेदारची भूमिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरली आहे. आजच्या घडीला अमितचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पण, अभिनय क्षेत्रातील त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला होता.
अमित भानुशालीचा जन्म गुजराती कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्याच्या घरातील कोणीच इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नव्हतं. करिअर सुरू केल्यावर सुरुवातीला त्याला या क्षेत्रात कोणाचंही पाठबळ नव्हतं. जवळपास दीड वर्षे अभिनेता इंडस्ट्रीत ऑडिशन देत होता. पण, त्याला कुठेही काम मिळत नव्हतं.
शेवटी, अमितने नोकरी करायचं ठरवलं. त्याचं जॉइनिंग लेटर सुद्धा आलं होतं. पण, नोकरी करायची त्याची इच्छा नव्हती. त्याचा संपूर्ण कल अभिनयाकडे होता. हे जाणून घेऊन त्याच्या वडिलांनी अमितच्या नोकरीचं ऑफर लेटर फाडून टाकलं आणि ते म्हणाले होते, “जा…! अभिनय क्षेत्रात काम कर, तुझा बाबा तुझ्याबरोबर कायम आहे.” अमितच्या आई-बाबांनी त्याला खूप साथ दिली.
अमित भानुशालीने हाच प्रसंग ‘स्टार प्रवाह’च्या ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात सांगितला. यावेळी वडिलांच्या आठवणीत अभिनेत्याला अश्रू अनावर झाले होते. हा भावुक प्रसंग सांगताना अमितचे डोळे पाणावले होते. यावेळी अमेय वाघ आणि समीर परांजपे यांनी अमितला जवळ येऊन धीर दिला. अमितने सांगितलेला भावुक प्रसंग ऐकून विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे यांच्यासह मंचावर उपस्थित सगळेच कलाकार भावुक झाले होते.
दरम्यान, येत्या शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता प्रेक्षकांना ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचा हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. नेटकऱ्यांसह अमित भानुशालीच्या चाहत्यांनी या प्रोमोवर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.