छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबरोबरच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही वरच्या स्थानावर आहे. आता अशातच प्रेक्षक या मालिकेतील एका सीनचं खूप कौतुक करताना दिसत आहेत.
‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये जुई गडकरी ‘सायली’ आणि अमित भानुशाली ‘अर्जुन’ या प्रमुख भूमिका साकार आहेत. या मालिकेत वरचेवर वेगवेगळी वळणं येत असतात. सायली आणि अर्जुन यांनी स्वतःच्या इच्छेविरुद्ध एकमेकांशी लग्न केल्यावर आता लग्नानंतर त्यांच्यात छान केमिस्ट्री जमली आहे. तर आता अर्जुन सायलीवर असलेलं त्याचा प्रेम तिच्यासमोर व्यक्त करताना दिसणार आहे.
या मालिकेमध्ये सायलीवर नुकताच जीवघेणा हल्ला झाला आणि ती सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर आता मालिकेच्या आजच्या भागात तिला शुद्ध आल्याचं दिसणार आहे. याबरोबरच अर्जुन तिच्या काळजीपोटी तिच्याजवळ जातो आणि तिच्याशी बोलता बोलता तिच्याबद्दल त्याला वाटणारा प्रेम व्यक्त करतो असंही पहायला मिळेल. त्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “शेतकरी मुलाशी लग्न करशील का?” जुई गडकरीने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…
या प्रोमोला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी या सीनचं आणि त्यांच्यातल्या या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं, “किती सुंदर क्षण असतात हे…” दुसरा म्हणाला, “या ट्रॅकमध्ये अमित भालुशालीने केलेलं काम खूप मस्त आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “अखेर तो क्षण आला.” तर आणखी एकाने लिहिलं, “तुम्ही स्टार प्रवाहवरची बेस्ट जोडी आहात. मला ही मालिका खूप आवडते. तुम्हा दोघांचीही कामं उत्तम आहेत.” त्यामुळे आता सर्वजण आजच्या भागाची उत्सुकता व्यक्त करत आहेत.