मुंबई: शंभर वर्षाहून मोठी पंरपरा असलेला गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यावर्षी पासून सरकार थेट सहभागी होऊन हा महोत्स्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच यंदापासून राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा नि्र्णय घेतला आहे. शेलार यांनी एका निवेदनाद्वारे राज्यात गणेशोत्सवात सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर केली.

महाराष्ट्र ही कला, संस्कृती व परंपरेची समृद्द भूमी आहे. संत-सुधारकांचा, थोरांचा-विरांचा,भक्तीचा-अध्यात्माचा आणि सर्वसमावेशकतेचा वारसा या भूमीला लाभलेला आहे. राज्याच्या आर्थिक/ सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचा पाया सामाजिक एकरुपतेने घातलेला आहे. ही एकरूपता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाने मोलाची भूमिका पार पडलेली आहे. शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदूच आहेत.

याच मानबिंदूच महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे यासाठी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे सरकारने ठरवल्याचे शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सवाचे परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्यास आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि राज्याचा प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या या महोत्सवाशी जोडला जाण्यासाठी राज्य महोत्सव होणे आवश्यक आहे. यासाठी सरकार सुलभकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार असून यापुढे या महोत्सवात सरकारचा थेट सहभाग असेल. त्यानुसार राज्य महोत्सवाच्या एका लोगोचे अनावरण करण्यात येणार असून गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्याची घोषणाही शेलार यांनी केली. तसेच उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करणार,विर्सजन सोहळयामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा व वाहन व्यवस्था उपलब्ध करणार तसेच राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्याना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना, उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

असा गणेशोत्सव साजरा होणार

●संपुर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्राची कला व संस्कती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाहीतर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठया प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही करण्यात ये्ईल.. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार.
●गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानमाला तसेच अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार.

●राज्यातील महत्वाची मंदीरे आणि सर्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचे ऑनलाइन दर्शन घरबसल्या व्हावे यासाठी एक पोर्टल निर्माण करण्यात येणार.
●उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत तालुका स्तरावर स्पर्धेद्वारे विविध पारितोषिके देण्यात येतील.

●घरगुती गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो व्हिडिओ क्लिप्स पोर्टलवर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार
●ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संकृती दर्शिवलेली आहे अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येणार

●संपूर्ण राज्याभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार
●एका ड्रोनशो चे आयोजन करणार

●आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम उपक्रम हाती घेणार
●पारंपारिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप अनुदान देणार

●राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन