मुंबई : पक्षांच्या धडकेमुळे हवाई वाहतुकीला निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने येत्या १५ दिवसांत वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे आधुनिकीकरण करून त्यावर आच्छादन करण्यासाठी निविदा काढावी आणि काम तातडीने सुरू करावे. तसेच विमानतळाच्या परिसरातील कचरा संकलन केंद्र व कचराभूमीवर पक्षी येऊ नयेत, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शास्त्रज्ञ, पर्यावरणविषयक तज्ज्ञ, तसेच तरुण अभ्यासकांकडून नव्या कल्पना जाणून घ्याव्या, असे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले.

मुंबई विमानतळ परिसरात पक्षांच्या धडकेमुळे विमानांना होणारा धोका कमी करण्यासंदर्भात ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात नुकतीच बैठक झाली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, मुंबई अग्निशमन दल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील देवनार, कांजूरमार्ग कचराभूमी आणि वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्र विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येते. कचराभूमीत खाद्य मिळत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षांचा वावर असतो. त्यामुळे विमानतळावर उतरणाऱ्या व येथून उड्डाण करणाऱ्या विमानांना धोका निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करव्या याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. विमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने महापालिका याबाबत काय उपाययोजना करू शकते याचा आढावा घेण्यात आला. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली.

पंधरा दिवसात निविदा

विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या वर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राचे एकूण क्षेत्रफळ २ एकर असल्याने त्याचे आधुनिकीकरण करावे. यामध्ये शेड कव्हर, दुर्गंधी नियंत्रण प्रणाली, मोबाइल कॉम्पॅक्शन युनिट आदी उपाययोजना कराव्यात. यासाठी येत्या १५ दिवसांत निविदा काढून लवकरात लवकर काम सुरू करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पक्षांनी विमानाला धडक दिल्याच्या घटनेत वाढ

मुंबई विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरातील कचराभूमी, कांदळवन अथवा वनक्षेत्र यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पक्षांचा वावर आहे. त्यामुळे विमान वाहतुकीला धोका निर्माण होतो. विमानाला पक्षी धडकण्याच्या घटना वारंवार घडत असून २०२० मध्ये २०, २०२१ मध्ये ३५, २०२२ मध्ये ३६, २०२३ मध्ये ६०, २०२४ मध्ये ५९, तर जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत १९ पक्षी विमानाला धडकल्याची नोंद झाली आहे. तसेच ठाणे खाडी परिसरात येणाऱ्या परदेशी पक्षांमध्येही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात २०१५ मध्ये १० हजार फ्लेमिंगो आले होते. या परिसरात २०२४ मध्ये दोन लाख फ्लेमिंगोची नोंद झाली आहे. विमानाला २०२४ मध्ये ५० ते २०० फूट उंचीवर तीन पक्षी धडकले होते. ५०० फुटापर्यंत १६, तर ५०० ते १००० फुटापर्यंत १३ पक्षी विमानाला धडकले होते. तर तीन हजार फुटापेक्षा जास्त उंचीवर ११ पक्षी विमानावर धडकले होते.

उपाययोजना सुचविण्यासाठी हॅकेथॉन आयोजित करा

पक्षांना रोखण्यासाठी पालिकेकडे सध्या कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नाही. एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याची विल्हेवाट लवकर लावण्याबाबत महापालिका विचार करीत असून याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावर उपाययोजना सुचविण्यासाठी शास्त्रज्ञ, उद्योजक, तरुण अभ्यासक, स्टार्टअप यांना आवाहन करावे, त्यांच्याकडून नवनवीन कल्पना मागवाव्या, त्यांची हॅकेथॉन आयोजित करावी, असेही शेलार यांनी सांगितले. तसेच ज्या नवीन कल्पना येतील त्यांचा पर्यावरण विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसयटीच्या मदतीने अभ्यास करावा आणि त्याचा अहवाल तयार करावा. सदर अहवालाचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन करावी, अथवा राज्याची विमानतळ पर्यावरण समितीसोबत (एईएमसी) उपायोजनांबाबत सल्लामसलत करावी, असे निर्देश ॲड. शेलार यांनी यावेळी दिले.