.. मागे एकदा राज ठाकरे माझ्याकडे आले होते. ही फार जुनी गोष्ट आहे. म्हणजे बिंदा गेले ना, त्याच्याही आधीची ही गोष्ट आहे. बाळासाहेबांची तब्येत त्यावेळी बरी नव्हती. मी राज ठाकरेंना विचारलं की, ‘कसे आहेत बाळासाहेब?’ तर ते म्हणाले, ‘बाळासाहेबांना काही गाणी ऐकावीशी वाटताहेत आणि ते टेप ऐकतात. त्यामुळे तुमच्याकडे कॅसेट्स नेण्यासाठी आलोय.’ त्यावेळी माझ्याकडच्या बऱ्याचशा कॅसेट्स मी त्यांना दिल्या होत्या. म्हणजे त्याच्यावरुन मला कळलं की, त्यांना गाणं आवडतं.
बाळासाहेबांशी मुद्दामहून कधी गाण्यावर चर्चा होत नसे. राजकारण आमचा प्रांत नाही. पण कलावंतांचं मन लाभलेले बाळासाहेब राजकारणाबरोबरच संगीतातही रमत. मागे एकदा शिवउद्योग सेनेसाठी मी कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात ते मला भेटले. कार्यक्रम संपल्यानंतर ते स्टेजवर आले आणि मला म्हणाले, ‘कमाल आहे. कमाल आहे, तुम्ही एका दमात इतका वेळ गाताहात. साडेतीन-चार तास झाले. मला फार आश्चर्य वाटतं.’
अशा आमच्या भेटी होत. त्यांचा-आमचा परिचय फार जुना. पण ओळख जुनी असली तरी भेटी क्वचितच होत. असं असलं तरी जेव्हा मी त्यांना भेटत असे तेव्हा ते माझ्याशी खूप छान बोलत. खूप जोक्स सांगत. भरपूर हसवत.बाळासाहेबांची पहिली भेट कधी, कुठे झाली हे स्मरत नाही? पण एक आठवण आहे. मी ‘ऐ मेरे वतन के लोगों’ गायले होते. त्यावेळी ते त्यांना फार आवडलं होतं. त्यांनी आवर्जून भेटून हे सांगितलं होतं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’च्या आधी मी ‘आएगा आनेवाला’ गायले होते. त्याचाही उल्लेख करून गाणं आवडल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं होतं.
आमच्या एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं तर ते सहसा नाही म्हणत नसत. पण तब्येत बरी नसेल तर इलाजच नसतो. एरवी ते आवर्जुन येत. काही वर्षांपूर्वी आमच्या हॉस्पिटलसाठी पुण्याला आम्ही एक कार्यक्रम केला होता. बाळासाहेबांनाही बोलावलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी हॉस्पिटलसाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्या कार्यक्रमाला इतरही अनेक लोक आले होते. पण बाळासाहेबच एकटे होते ज्यांनी उठून आम्हाला देणगी जाहीर केली.
बाळासाहेबांचा आमचा जुना स्नेहसंबंध. भेटीगाठी होत नसतील, पण टेलिफोनवर चौकशी होतच असे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी कोल्हापुरात होते. तिथे मला कळलं की बाळासाहेबांची तब्येत बरी नाही. मी तिथून त्यांना फोन केला. विचारलं, ‘तब्येत कशी आहे?’
मला म्हणाले, ‘आता बरी आहे.’
‘कुठं आहात?’
म्हटलं – ‘मी कोल्हापुरात आहे.’
‘येणार केव्हा मुंबईत?’ – त्यांनी विचारलं.
म्हटलं – ‘येईन सात-आठ दिवसांनी’ तर त्यावर ते म्हणाले, ‘मग आल्यावर घरी या. मासळीबिसळी खाता की नाही?’
मी म्हटलं – ‘खाते, पण तिखट जास्त चालत नाही.’
तेव्हा ते अगदी प्रेमानं म्हणाले, ‘पण तुम्ही या. तुमच्यासाठी आम्ही स्पेशल मासळीचं जेवण करू. बसून गप्पा मारू.’
काही नातीच अशी असतात. जाणिवेच्या पातळीवरची. ज्यांना गरज नसते सततच्या भेटीगाठींची. अधूनमधून पत्र लिहिण्याची वा मुद्दामहून टेलिफोन करण्याची. जो तो आपापल्या ठिकाणी, पण एकमेकांबद्दल प्रेम-आदर बाळगून. बाळासाहेबांचं आणि आमचं नातं हे असंच होतं. कुठेही कृत्रिमपणा नाही. निव्वळ आणि निव्र्याज प्रेम, आपुलकी!’
बाळासाहेबांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या गौरवग्रंथातून साभार
हृदयनाथ मंगेशकर
ना. धों. महानोर
बाळासाहेब ठाकरे दहशतवादी नव्हते का?- मुशर्रफ
अजित वाडेकर