भाजपाचे नेते तथा केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वैर हे अनेकदा उघड उघड दिसलेले आहे. राणे आणि राऊत यांचे वाकयुद्ध गेल्या काही दिवसांपासून रंगले आहे. त्यात काल भांडुप येथील कोकण महोत्सवात नारायण राणे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. या कोकण महोत्सवात नारायण राणे यांनी आपल्या कोकणी शैलीत उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला. ठाकरे गटाकडून शिंदे – फडणवीस सरकारची ‘खोके सरकार’ अशी हेटाळणी करण्यात आली होती, या टीकेला राणे यांनी प्रत्युत्तर देत आम्ही मातोश्रीच्या कोणत्या माळ्यावर काय काय पोहोचवलं, याची यादी लवकरच सांगू, असा इशारा दिला.

मातोश्रीवर आम्ही काय काय पोहोचवलं हे जाहीर करणार

नारायण राणे म्हणाले, “आज शिवसेनेची काय अवस्था झाली हो. सेनेचे ४० आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेसोबत निघून जातात. शिवसैनिक उघड्या डोळ्याने पाहत बसले. उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात. शिवसेना रडणारी कधीच नव्हती. त्याला शिवसेना नाही म्हणत. शिवसेना ही लढणारी होती. आता कुठे गेलं तुमचं सळसळतं रक्त? दोन्ही हात सावरुन घोषणा देत होतात, आता कुठे गेल्या तुमच्या घोषणा. तुम्ही दुसऱ्यांना खोके म्हणतात. तुम्ही खोके नाही घेतले का? आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? उद्धव ठाकरे सांगेल त्यादिवशी मी जाहीर करेल की मातोश्रीच्या माळ्यावर काय काय पोहोचवलं ते…”, असे आव्हानच राणे यांनी यावेळी दिले.

हे वाचा >> संजय राऊत खासदार कोणामुळे झाले? नारायण राणेंचा मोठा दावा; म्हणाले, “हे पाप तर…”

राणे पुढे म्हणाले की, “आम्हाला बोलायला लावू नका. वयाच्या १५ व्या वर्षांपासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांच्या प्रेमासाठी आम्ही वेडे होतो. आम्ही जीवाची पर्वा न करता काम केलं. आता तुमच्याकडे असलेल्या नेते म्हणजे, संपादकाचा पण पगार घेतात, नेता म्हणून तोडबाजी पण करायची? असे काम मी केले नाही. आम्ही शिवसेनेसाठी त्याग केला. उद्धव ठाकरे आयते सत्तेवर अडीच वर्ष बसले.”