देशाच्या विकासात आणि संपूर्ण देशाला जोडण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं योगदान मोठं आहे. देशाला उत्तम रस्ते, महामार्ग, वाहतुकीसाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा द्यायचा नितीन गडकरी यांनी कायम प्रयत्न केला. नुकतीच त्यांनी एका यूट्यूब पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आणि अशा बऱ्याच गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज शमानी या प्रसिद्ध यूट्यूबरच्या ‘पॉडकास्ट शो’मध्ये नुकतीच नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकारण, देशाचा आर्थिक आणि सर्वांगीण विकास, त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से, देशाचे नेतृत्व आणि त्यांच्या स्वप्नातील भारत या विषयांबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. याच मुलाखतीमध्ये त्यांना मुंबईच्या खड्ड्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा : मुंबई: जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल

मुंबईचे खड्डे नेमके कधी भरून निघणार, या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी फार विस्तृत समर्पक असं उत्तर दिलं आणि त्यांच्या नियोजनाबद्दल त्यांनी खुलासा केला. नितीन गडकरी म्हणाले, “मुंबईत आम्ही जवळजवळ ५५ उड्डाणपूल बांधले. वरळी-वांद्रे सी-लिंक आम्ही बांधला, मुंबई-पुणे हायवे बांधला. मी मुंबई महानगरपालिकेशी याबाबत बोललो आहे. नुकताच मी मुंबईचे कमिशनर इक्बाल सिंग चहल यांना बेस्टच्या एका कार्यक्रमात भेटलो. त्या वेळी मी त्यांना एक सल्ला दिला की ६ किंवा ८ इंचांचं सिमेंट काँक्रीटीकरण करून घ्या. त्यांनी ६००० कोटी रुपयांचा हा कार्यक्रम हाती घेतला आहे आणि पूर्ण मुंबईत ते हे काम करणार आहेत.”

याच मुद्द्याला धरून नितीन गडकरी यांनी मुंबईत पावसाळ्यात पाणी भरण्याच्या समस्येवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “खासकरून जेव्हा समुद्रातील पाण्याची पातळी वाढते तेव्हा मुंबईत समुद्रातील पाणी आत शिरतं त्यासाठी एक खास ड्रेनेज सिस्टीम तयार करायला हवी. यापैकी रस्त्यांचं काँक्रीटीकरणाचं काम लवकरच पूर्ण होईल. आपल्याला बदलत्या वेळेनुसार आणि तंत्रज्ञानानुसार काम करणं आवश्यक आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister nitin gadkari speaks about potholes in mumbai avn