मुंबई: एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रीत केले असून, सध्या राज्यात आठ लाख कोटींपेक्षा अधिक खर्चाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. त्यांतून सामान्यांचे जीवनमान सुखकारक होईल, गुंतवणुकीतही भरीव वाढ होईल. तसेच राज्याची विकासवाट प्रकाशमान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात गुरुवारी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्राच्या विकासवाटा’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीचा वेध घेतला. ‘‘गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या विकासवाटा थोड्या अंधूक झाल्या होत्या. विकासाची गाडी एकाच जागी थांबली होती. परंतु महायुती सरकारने डबल इंजिन जोडून त्या गाडीला गती दिली आहे. सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांतील सर्व अडथळे दूर केले असून सध्या आठ लाख कोटींपेक्षा अधिक खर्चाची विकासकामे सुरू आहेत. तर अटल सेतू, समृद्धी महामार्ग, सागरी मार्ग यांसारखे प्रकल्प येत्या काळात परिवर्तन घडविणारे ठरतील,’’ असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता१० राज्यांतील ६० जागांवरील उमेदवारांवर काँग्रेसचे शिक्कामोर्तब; वायनाडमधून राहुल गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत झालेल्या देशाच्या प्रगतीचा आलेख कालच एका राष्ट्रीय परिषदेत गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर आकडेवारीसह मांडला असून या प्रगतीत महाराष्ट्राचेही मोठे योगदान असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. महाराष्ट्राच्या योगदानाशिवाय हे परिवर्तन घडणे अशक्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर जबाबदारीही मोठी आहे. केंद्र सरकारच्या पाठबळामुळेच राज्याचा विकासरथ चौफेर घौडदौड करीत आहे.

महाराष्ट्राच्या विकासवाटा’ कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन

देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्स करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार असून त्यापेैकी एक लाख कोटी डॉलर्सचा वाटा महाराष्ट्र सहज उचलेल. निती आयोगानेही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशावर (एमएमआर) लक्ष केंद्रीत केले आहे. सन २०३०पर्यंत महानगर प्रदेशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ३०० अब्ज डॉलर्स करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘रस्ते, मेट्रोचे जाळे, रिंग रोड आणि सागरी सेतू उभारण्यात येत आहेत. येत्या तीन-चार वर्षांत मेट्रो-३सह एमएमआरमधील जवळपास २०० किमी लांबीची मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे रस्त्यावरील २५ ते ३० लाख वाहने कमी होतील. किनारपट्टी मार्गाचा पहिला टप्पाही लवकरच सुरू होत असून पूर्व मुक्त मार्ग थेट ठाण्याच्या बाहेरून मुंबई- अहमदाबाद मार्गाला जोडण्यात येत आहे. अटल सेतू, किनारपट्टी मार्ग यांसारखे प्रकल्प लोकांना फायदेशीर ठरणारे आहेत.’’

समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरीपर्यंतचा आणखी एक टप्पा खुला झाला असून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकही लवकरच खुली करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात सात हजार किलोमीटर लांबीचे शीघ्र संचार द्रुतगती महामार्गांचे जाळे तयार करण्यात येणार असून नागपूर- गोवा शक्तिपीठ, मुंबई- गोवा, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गाचेही काम सुरू होईल, असेही शिंदे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले, तर मुख्यमंत्र्यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी केले.

विकासाला नवी दिशा!

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम आणि ठणठणीत आहे. गेल्या वर्षभरात राज्याचे स्थूल उत्पन्न १० टक्क्यांनी वाढले असून वस्तू आणि सेवाकर संकलनातही राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. परिषदेने भौगोलिक रचना, शेती-माती-सिंचन आणि पीक पद्धतीचा विचार करून सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून दिला आहे.

मुंबई वाढतच आहे. मुंबईतून नवी मुंबई, तिसरी मुंबई आणि आता आपण महामुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. एकनाथ शिंदे</strong>, मुख्यमंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister shinde announced an infrastructure project worth eight lakh crores mumbai amy