मुंबई : मे महिन्यात राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना, राज्यातील भाजप महायुतीचे सरकार मात्र झोपले आहे. राज्य सरकारने तातडीने शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केली.
शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळणारी एक रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पीक कापणीवर आधारित नवी विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नाही. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही. या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून पुन्हा १ रुपयात पीक विमा योजना राबवावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
राज्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बि-बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. राज्यभर बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे खते-बियाणे ‘लिंकिंग’ करून व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. सरकार फक्त कारवाईच्या घोषणा करते, पण कारवाई काही करत नाही. त्यामुळे आतातरी सरकारने जागे व्हावे आणि ‘लिंकिंग’ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे सपकाळ म्हणाले.
राज्य सरकारकडे निधी नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केंद्राकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणून लाडक्या बहिणींना २,१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
काँग्रेसची २१ मे रोजी ‘तिरंगा यात्रा’
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय जवानांनी अभिमानास्पद कामगिरी केली. आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी २१ मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत तिरंगा यात्रा काढणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी या वेळी दिली.