मुंबई : वांद्रे परिसरातून जप्त करण्यात आलेल्या चार हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रांच्या तपासाची व्याप्ती वाढली असून या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके अन्य शहरांमध्ये रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुन्हे शाखेची पथके ठाणे, पालघर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी जाऊन तपास करीत आहेत. ही प्रतिज्ञापत्रे कोणी आणि कशी बनवली? याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.
हेही वाचा >>> “संजय राऊत मला भेटतात तेव्हा दोनच प्रश्न विचारतात ते म्हणजे…”, भाऊ सुनिल राऊतांची भावनिक प्रतिक्रिया
वांद्रे न्यायालयात कामानिमित्त आलेल्या एका सेवानिवृत्त बीएआरसी कर्मचाऱ्याने या प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे पाहिले होते. त्यावर नोटरीचा शिक्का मारून स्वाक्षरी करण्यात येत होत्या. याची माहिती मिळताच निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार हजार ६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे ताब्यात घेतली. तसेच, सेवानिवृत्त बीएआरसी कर्मचाऱ्याची तक्रार दाखल करून घेत याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात बनावट दस्तावेज बनविणे आणि फसवणूक करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करीत आहे.
हेही वाचा >>>सोन्याच्या तस्करीसाठी बनवला विशेष कोट ; सुदानमधील दोन नागरिकांसह तिघांना अटक विमानतळावरून १० किलो सोने जप्त
निवडणूक आयोगाला सादर करण्यासाठी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून शिवसैनिकांची खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हे शाखेने मुंबईत काही जणांकडे चाैकशी करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. प्रतिज्ञापत्रांची छाननी आणि आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासासाठी गुन्हे शाखेची पथके ठाणे, पालघर, कोल्हापूर, अहमदनगर आणि नाशिक आदी ठिकाणी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.