मुंबईत ज्या मराठी महिलेला घर नाकारण्यात आलं त्या मराठी महिला म्हणजे तृप्ती देवरुखकर. त्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही भेटल्या. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या हिंमतीचं कौतुक केलं. तसंच समाजात द्वेष भावनेला खतपाणी घातलं जातं आहे त्याचा त्यांनी निषेधही नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्या काळात घर नाकारण्यात आलं होतं असा दावा आव्हाड यांनी केला. मुंबईत मांस,मच्छी, मटण खाणाऱ्यांना घरे मिळत नाहीत. ही हिंमत होते कारण मराठी माणूस आवाज उठवत नाही. आज या भगिनीने आवाज उठवला म्हणून तिचं कौतुक आहे. मुलुंडमध्ये यापुढे मराठी माणसासाठी ५० टक्के घरे राखीव ठेवा अशीही मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

मराठी माणूस सहन करतो आणि त्यामुळे इतरांची हिंमत वाढते. तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारण्याची हिंमत झाली कशी काय? आपण पहिल्यापासून कणखर भूमिका घ्यायला हवी होती. मुंबई ही कोळ्यांची, आगरी बांधवांची, पाठारे प्रभूंची जे मूळ मांसाहार करणारे होते त्यांचीच मुंबई. मासे, मटण, भात, तांदुळाची भाकरी हे मुंबईतलं मूळ जेवण आहे. मात्र मटण, मासे खातात म्हणून घर नाकारलं जातं, मराठी आहात म्हणून घर नाकारलं जातं. याचा मागे जाऊन विचार केला पाहिजे. हा भेदाभेद सुरु कधी झाला? एक काळ असाही होता की बाबासाहेब आंबेडकरांनाही घर नाकारण्यात आलं होतं. मुंबईत जे काही घडलं ते आज घडलेलं नाही. हे सगळे प्रकार बंद व्हायला हवं. हे बंद करण्याची ताकद फक्त मराठी माणसामध्ये आहे. चांगल्या सोसायटीत शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब लोकांना, मुस्लिमांना घरं नाकारली जातात. कुणी काय खायचं? कुठे राहायचं? हे ठरवण्याचा अधिकार कुणाच्या बापाला नाही. मात्र आपण बघत बसतो. राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत. मतांचं लांगुलचालन करायचं असतं, लाचारी असते. हा समूह दुखावेल, तो समूह दुखावेल असं करत करत मराठी माणसाची टक्केवारीच कमी होत चालली आहे.

हे पण वाचा- मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं! कवी सुरेश भटांच्या ‘या’ ओळी पोस्ट करत मनसेचा सरकारला इशारा

मतांच्या लाचारासाठी

लहानपणी एक वाक्य सर्रास ऐकू यायचं, मुंबई तुमची भांडी घासा आमची. ही हिंमत आली कुठून? सगळ्याचे मालक तेच आहेत. पैशांचं स्रोत तिथूनच आहे त्यामुळे त्यांना दुखावलं जात नाही. आपल्या नसा त्यांच्या हातात आहेत. मतं जातात, त्यामुळे मग मराठीचा स्वाभिमान, अस्मिता सगळं बाजूला ठेवलं जातं. आपण मतांसाठी लाचार आहोत हे त्या पक्षाने स्वीकारावं असा टोलाही आव्हाड यांनी भाजपाला लगावला. या देशात विशिष्ट राजकीय पद्धतीमुळे आपण द्वेष भावना वाढत आहोत. पंकजा मुंडेंना घर नाकारलं गेलं. यातही भेदभावच आहे. दुसरं काहीही नाही, पंकजा मुंडेंनी त्यांच्या पक्षात हा प्रश्न विचारायला हवा होता. द्वेष पेरला की तोच उगवणार, त्याचाच वटवृक्ष होतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How dare a marathi man be denied a house in mumbai jitendra awhad questions govt after meeting trupti devrukhkar scj