मुंबई : दिल्लीतील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय वैमानिक तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी पवई पोलिसांनी २७ वर्षीय मित्राला अटक केली आहे. अंधेरीमधील मरोळ येथील राहत्या घरात सृष्टी विशाल तुली (२५) या तरूणीने आत्महत्या केली होती. आरोपीने मृत तरूणीचा मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मृत तरूणीच्या कुटुंबियांनी तिची हत्या करून ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंधेरी (पूर्व) येथील मरोळ पोलीस कॅम्पमागील कानाकिया रेन फॉरेस्ट येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या या तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मित्र आदित्य पंडितनेही वैमानिक बनण्यासाठी परीक्षा दिली होती. पण तो अपयशी ठरला होता.

हेही वाचा : मुंबई : डोंगरीमधील इमारतीला भीषण आग

प्राथमिक तपासानुसार, तुली रविवारी गोरखपूरहून परतल्यावर तिचे पंडितसोबत भांडण झाले. पंडित रात्री १ वाजता दिल्लीला निघून गेला. तुलीने त्याला दूरध्वनी करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे पंडित परत तिच्या घरी आला, पण दार आतून बंद होते. त्याने किल्लीवाल्याला बोलवून दरवाजा उघडला तेव्हा तुलीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. पंडितने तिला मरोळमधील सेवन हिल्स रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.

कुटुंबीयांचे आरोप

तुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, पंडित तिच्यासोबत सर्वांसोबत भांडण करायचा. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. तसेच तिच्या खाजगी आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच तो तिच्यावर मानसिक दबाव आणत होता. पंडितने तुलीला औषध देऊन मारले असावे आणि नंतर आत्महत्येचा बनाव केला असावा, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी पंडीतला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तुलीचे काका विवेककुमार यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

तुली गोरखपूरमधली पहिली महिला वैमानिक होती. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही तिला सन्मानित केले होते. तिच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. तुलीच्या कुटुंबाचा लष्करी वारसा होता; त्यांचे आजोबा नरेंद्रकुमार तूली १९७१ च्या भारत-पाक युद्धात शहीद झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai 25 year old girl pilot committed suicide due to mental harassment from boyfriend mumbai print news css