मुंबई- एका महिलेची लोकल ट्रेनमध्ये राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग वडाळा रेल्वे पोलिसांनी शोधून परत मिळवून दिली. त्या बॅगेत ४ लाखांचे सोन्याचे दागिने होते. मात्र रेल्वेच्या मदत क्रमांकावर संपर्क साधून लवकर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

साताऱ्यात राहणाऱ्या प्राजक्ता बावधाने आपल्या ४ वर्षाच्या मुलासह मुंबईत भावाकडे आल्या होत्या. त्या भावासह त्या मानसरोवर येथे राहणाऱ्या मोठ्या बहिणीला भेटायला जात होत्या. गावातील घरात चोरी होऊ नये म्हणून त्यांनी घरात असलेले ४ लाखांचे सोन्याचे दागिने घेतले होते. त्यांनी कुर्ल्यावरून पनवेलला जाणारी ट्रेन पकडली. त्यांचा भाऊ उदय शिंदे हा पुरूषांच्या डब्यात होता तर प्राजक्ता या मुलासह महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यात होत्या. सायंकाळी ६ वाजता ते मानसरोवर रेल्वे स्थानकात उतरले. त्यावेळी गडबडीत बॅग ट्रेनमध्येच विसरल्याचे प्राजक्ता यांच्या लक्षात आले. दुसऱ्या डब्यातून उतरलेला त्यांचा भाऊ उदय शिंदे याला त्यांनी हा प्रकार सांगितला. उदय शिंदे यांनी तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाईनला संपर्क साधण्यास सुरवात केली. मात्र कुणी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी मग मानसरोवर रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. परंतु त्यांनी बॅग मिळणार नाही, असे सांगून असमर्थता व्यक्त केली. दरम्यान, शिंदे आपल्या बहिणीला घेऊन पनवेलला गेले. मात्र ती गाडी तोपर्यंत पुन्हा (रिर्टन) गेली होती. या काळात ते सारखे रेल्वेच्या मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांचा फोन लागला आणि मग पुढची सूत्र हलली.

वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जाधव हे डॉकयार्ड रेल्वे स्थानकात होते. त्यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी ट्रेनमध्ये तपास केला. सुदैवाने ती बॅंग ट्रेनमधील रॅकवर सुरक्षित होती. त्या बॅगेतील दागिन्यांची पडताळणी करण्यात आली आणि प्राजक्ता बावधने यांच्याकडे बॅग सुपूर्द करण्यात आली अशी माहिती वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशु्द्दीन शेख यांनी दिली.

रेल्वे हेल्पलाईनकडून वेळेवर प्रतिसाद नाही

प्राजक्ता बावधने आणि त्यांचे भाऊ उदय शिंदे यांनी दागिने असलेली बॅग परत मिळवून दिल्याबद्दल रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत. मात्र रेल्वे पोलिसांच्या मदतवाहिनीकडून त्वरीत प्रतिसाद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बॅग ट्रेनमध्येच विसरल्याचे बहिणीकडून समजताच मी रेल्वेच्या हेल्पलाईनवर फोन केला. किमान ५० फोन केले असतील पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मी बॅग शोधत शोधत पनवेल स्थानकात गेलो तेव्हा जवळपास २ तासांनी संपर्क झाला. त्यानंतर मग बॅगचा शोध सुरू झाला, असे उदय शिंदे यांनी सांगितले. रेल्वे पोलीस देखील रेल्वे सुरक्षा बलाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधण्यास सांगत होते. त्या दोघांमध्ये समन्वय नव्हता. मदत वाहिनीकडून त्वरीत प्रतिसाद मिळाला असता तर आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला नसता असेही शिंदे यांनी सांगितले.