मुंबई : मुंबई-ठाण्यातून गुजराती व राजस्थानी लोकांना बाजूला केल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही व मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच राहणार नाही, असे विधान करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसाचा व महाराष्ट्राचा अपमान केला असून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदूमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आहे. राज्यपालपदाची प्रतिष्ठा त्यांनी घालवल्याने कोश्यारी यांना परत पाठवले पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंधेरी येथील चौकाचे नामकरण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई ही गुजराती व राजस्थानी लोकांमुळे आर्थिक राजधानी असल्याचे वादग्रस्त विधान केले. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्या विधानाचा समाचार घेतला. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करत असतात. पदभार स्वीकारताना जात-भाषा-प्रांत-धर्म यावरून भेद न करण्याची शपथ घेतली जाते. पण कोश्यारी यांनी भाषा-प्रांत यावरून लोकांमध्ये भेद निर्माण करून आग लावण्याचे काम करत घटनात्मक पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. मराठी माणसाचे योगदान-श्रम यावर मुंबई उभी राहिली आहे. देशातील इतर भागातील लोकांनीही त्यात योगदान दिले. पण भाषा-प्रांत यावरून समाजात दुही निर्माण करणारे विधान कोश्यारी यांनी केले. गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे गुजराती-राजस्थानी-मराठी यांच्यात म्हणजेच हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान केला. अशा कोश्यारी यांना घरी पाठवायचे का तुरुंगात याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गेले तीन वर्षे  कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मीठ खाल्ले, पण ते खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. राज्यपालांना तात्काळ परत पाठवावे लागेल, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यपाल पद हे मानाचे असते. मला त्याचा अनादर करायचा नाही. पण त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने पदाचा आदर ठेवलेला नाही, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. ह्णमहाराष्ट्र का घी देखा लेकीन कोल्हापूर का जोडा नही देखा, असे विधान करत कोल्हापुरी वाहणा हे मराठी उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. त्या वाहणांचा काय उपयोग करायचा हा वेगळा विषय आहे, असा सूचक टोला ठाकरे यांनी लगावला. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे, पण राज्यपालांना नाही याची खंत वाटते. मुंबई ही मराठी माणसाने हक्काने मिळवली असून कोश्यारींनी आंदण दिलेली नाही.

पोटातले ओठात आले : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ज्या पक्षाचे आहेत त्यांचा महाराष्ट्राकडे बघायचा दृष्टिकोन कोश्यारी यांच्या विधानामुळे उघड झाला आहे. दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत व मुंबईतील पैशांवर आहे हे राज्यपालांनी आपल्या विधानातून स्पष्ट केले. कळत नकळत मनातले बोलून खरे रूप दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पोटातले ओठातून बाहेर आले. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा कोश्यारी यांच्या विधानाचा हेतू दिसतो, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

मराठी माणसाला डिवचू नका – राज ठाकरे

मुंबई:  महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, कुणीतरी सांगितले म्हणून मराठी माणसाला डिवचू नका अशा शब्दात  मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी राज्यपालांना खडसावले आहे. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? असा सवालही त्यांनी केला आहे. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insulting maharashtra divide hindus uddhav thackeray demand recall governor ysh