मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये आणि महाराष्ट्रातील वाहनांवर तेथे होत असलेले हल्ले, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या ‘महाराष्ट्रद्रोहींविरोधात मोर्चाची गुरुवारी घोषणा केली. मोर्चा भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून सुरु होईल आणि आझाद मैदानात त्याचे सभेत रुपांतर होईल. मोर्चाच्या तयारीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राचा अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महनीय व्यक्तींबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तर महाराष्ट्रातील काही गावांवर हक्क सांगितला आहे. अशा महाराष्ट्रद्रोहींविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकार मौन पाळून असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मर्यादा सोडून वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March 17th dec of mahavikas aghadi bjp with governor bhagat singh koshyari leaders chhatrapati shivaji maharaj defamatory statements ysh