मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आएमडी) आणि भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राने (आयएनसीओआयएस) मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागांतील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव आणि मन्नारच्या आखाताच्या भागात १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान ३५ ते ४५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची, तसेच काही ठिकाणी ५५ किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी झोत येण्याची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांना समुद्री भागात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.
वादळी स्थितीचा प्रभाव २० आणि २१ ऑक्टोबर रोजी आणखी काही भागांपर्यंत वाढण्याची शक्यता असून, पूर्व आणि मध्य अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये ताशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा, अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, लक्षद्वीप, मालदीव आणि आग्नेय अरबी समुद्र परिसरात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असून, समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनी खबरदारी घ्यावी. समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकार आणि मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व मच्छिमार बांधवांना हवामान खात्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पुढील आदेश मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहनही केले आहे.