मुंबई : एकल वापरातील प्लास्टिक हा राक्षस आहे, त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्यरत आहे. पण, या कामात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणारे बदल गंभीर व अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळे एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान सुरू केले आहे. हे अभियान लोकसहभाग असेल तरच यशस्वी होणार आहे. एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात मंत्रालयापासून केली आहे. बदलती जीवनशैली व वातावरणातील बदलांमुळे कर्करोगासारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तंत्रज्ञान वाढले तसे त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. या सर्वांपासून पर्यावरण वाचविण्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या पिढीने प्लास्टिक बाटल्या न वापरणे, एकल वापराच्या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे, अशी पाऊले उचलली तर पुढच्या पिढीसाठी चांगले जीवन मिळेल, असेही मुंडे म्हणाल्या.

पर्यावरण विभागाने महापर्यावरण अॅप सुरू करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकसित, संपन्न, समृद्ध व दिशादर्शक कामे करणारे महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा हा देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे मत ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

या वेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा, माझी वसुंधरा अभियान ६.० टूल किट तसेच सल्फरडाय ऑक्साईड इमिशन ट्रेडिंग स्किमच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. प्रदूषणा संदर्भातील तक्रारीसाठी तयार करण्यात आलेल्या महा पर्यावरण अॅपचे अनावरणही मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.