मुंबई : राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे. हा टप्पा ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. स्पर्धात्मक अभियानासह काही नवीन उपक्रमांचा समावेश असलेल्या या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण ७२ कोटी २२ लाखांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणाला चालना देणे, तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने हा टप्पा राबविण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचा उद्देश केवळ शाळेचे सौंदर्य वाढवणे हा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासाला चालना देणे आणि शाळा प्रशासनात पारदर्शकता निर्माण करणे हा आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ‘स्पर्धेतून प्रेरणा, प्रेरणेवरून प्रगती’ हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू ठरतो, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. अभियानात सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा ३८ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी १०१ गुण आणि शैक्षणिक संपादणूकसाठी ६१ गुण असे एकूण २०० गुण असणार आहेत.
मागील दोन टप्प्यांमध्ये राज्यातील तब्बल ९५ टक्के शाळांनी सहभाग नोंदवून ‘सुंदर शाळा’ हे अभियान यशस्वी ठरवले होते. विद्यार्थी व पालकांच्या सक्रिय सहभागामुळे अनेक शाळांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रमांचा लक्षणीय विकास झाल्याचे शासनाने नमूद केले आहे. काही शाळांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही झाली आहे.
शाळांची दोन विभागात वर्गवारी
या अभियानासाठी शाळांची विभागणी (अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि (ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबविण्यात येईल.
अभियानाचा कालावधी
अभियानाच्या पूर्वतयारीसाठी २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी असणार आहे. अभियानाला औपचारिक कार्यक्रमाद्वारे ३ नोव्हेंबर रोजी सुरुवात होईल. अभियानाचा कालावधी ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होईल. मूल्यांकनाची प्रक्रिया १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पाडण्यात येणार असून त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.