मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून किमान ९८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. पाच जण अद्याप बेपत्ता असून रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता. मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नीलकमल’ ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोट कलंडली आणि बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ नौका तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली.

हेही वाचा : आरोग्य विभागाच्या रुग्णालयात रुग्णांना एक लाखाहून अधिकवेळा मोफत डायलिसीस!

घटना घडली त्यावेळी दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह बोटीवर एकूण ११४ जण होते. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ९७ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात ७५, नेव्हल डॉकयार्डमध्ये २५, अश्विनी रुग्णालयात एक, सेंट जॉर्जमध्ये नऊ, करंजे येथे १२, तर मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले आहे. नीलकमल बोटीवरील पाच कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. अपघाताची चित्रफीतही समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी यलोगेट पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली (पान ५ वर)(पान १ वरून) आहे. अपघातासाठी जबाबदार व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया कुलाबा पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू असताना हा अपघात घडला. नौदलाच्या बोटीवर असलेल्या एका नौसैनिकासह ‘ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफ्रॅक्चरर’ (ओईएम) या कंपनीचे दोन कर्मचारी अपघातात ठार झाल्याची माहिती आहे. ‘नीलकमल’ कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे नौदलाचे व्हाईस अॅडमिरल संजय जगजित सिंग यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये ‘युनिट्री जी वन ह्युमनॉईड रोबोट’ लक्षवेधी धोकादायक ठिकाणी मानवी हस्तक्षेप कमी करण्यास ठरणार उपयुक्त

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, दोन लाखांची मदत मृतांच्या वारसांना जाहीर केली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, तटरक्षक दल, मुंबई पोलिस यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईजवळ समुद्रात नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्याने अनेकांना प्राण गमवावे लागणे दु:खद आहे. दोन्ही बोटींमधील जखमींवर उपचार केले जात आहेत. नौदल आणि तटरक्षक दलाने बेपत्ता प्रवाशांचे शोध व बचावकार्य हाती घेतले आहे.

राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai boat accident navy speed boat crashing into ferryboat 13 died css