मुंबई : भारतीय रेल्वेतील सर्वात जुन्या रेल्वेगाड्यांपैकी एक असलेली ‘पंजाब मेल’ १ जून २०२५ रोजी गौरवशाली ११४व्या वर्षात प्रवेश करणार आहे. गेल्या ११३ वर्षांपासून ही रेल्वेगाडी प्रवाशांच्या सेवेत आहे. ही रेल्वेगाडी पहिल्यांदा १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकावरून रवाना झाली होती. त्यावेळी ते ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (जीआयपीआर) सेवांचे केंद्र होते.
फाळणीपूर्व काळात ‘पंजाब लिमिटेड’ ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वेगाडी होती. पेशावर छावणी येथे जाताना ती इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात असे. ही रेल्वेगाडी १९१४पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वाश्रमीचे व्हीटी) येथून धावू लागली. नंतर ती ‘पंजाब लिमिटेड’ऐवजी ‘पंजाब मेल’ म्हणून ओळखली जाऊ लागली आणि तिची दैनंदिन सेवा सुरू झाली. मुंबई – दिल्ली हा ‘जीआयपीआर’ मार्ग १९१४मध्ये सुमारे १,५४१ किमी लांबीचा होता. ही रेल्वेगाडी हे अंतर २९ तास ३० मिनिटांत पूर्ण करीत होती. १९२०मध्ये प्रवासाची वेळ कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आला. १९७२मध्ये या रेल्वेगाडीचे थांबे वाढविल्याने प्रवास वेळ पुन्हा २९ तासांपर्यंत वाढला.
२०११मध्ये पंजाब मेलला तब्बल ५५ थांबे होते. त्यावेळी मेलला सहा डबे होते. तीन प्रवाशांसाठी आणि तीन पोस्टल सामान आणि इतर वापरासाठी होते. तीन प्रवासी डब्यांमधून सुमारे २८८ प्रवासी प्रवास करत होते. सध्या या मेलला १ वातानुकूलित प्रथम श्रेणीसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ ‘एसएलआर’ (सेकंड लगेज आणि गार्ड व्हॅन) डबे आहेत. सध्या, ही रेल्वेगाडी २५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने धावते. पंजाब मेलमधून फक्त उच्च वर्गाच्या गोऱ्या साहेबांचा प्रवास होत होता. मात्र, काही वर्षांनी निम्न वर्गातील नागरिक मेलने प्रवास करू लागले. १९३०मध्ये पंजाब मेलमध्ये तृतीय श्रेणीचे डबे जोडण्यात आले. १९४५मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डबा जोडण्यात आला. तर, मे १९७६पासून पंजाब मेल डिझेल इंजिनासह धावू लागली. ही रेल्वेगाडी आता विद्युत इंजिनावर धावते. तसेच तिच्या रेस्टॉरंट कारची जागा पँट्री कारने घेतली आहे.
ऐतिहासिक ‘पंजाब मेल’ला डिसेंबर २०२०मध्ये ‘एलएचबी’ डबे जोडण्यात आले. त्यामुळे या रेल्वेगाडीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखद झाला. तसेच ‘एलएचबी’ कोच जोडल्याने प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या मेलमधून प्रवास करण्याची संधी मिळते. भारतीय रेल्वेच्या इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी प्रवासी पंजाब मेलमधून सफर करतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.