मुंबई : राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर १ जुलै २०२५ पासून ३ टक्के महागाई भत्त्यात वाढ थकाबकीसह देण्याचा निर्णय विनाविलंब घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढ केली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के झाला आहे. राज्य सरकारच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यातील वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत विनाविलंब निर्णय घ्यावा, अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.