मुंबई : पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे. त्या अंतर्गत पालिकेने तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याचे काम २३ मेपासून हाती घेतले. दरम्यान, २३ मे ते १ जून या दहा दिवसांच्या कालावधीत १ हजार ४५० मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात पालिकेला यश आले आहे. तसेच, जलपर्णी काढताना नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची खबरदारीदेखील घेतली आहे.
पवई तलाव प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तलावातील जलपर्णी हटवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीला वेग देण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा, असे आदेश यंत्रणांना देण्यात आले असून त्यानुसार कामांना वेग दिला आहे. जवळपास ६.६ किमीचा परीघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६०० हेक्टरपर्यंत पसरलेले आहे. या तलाव परिसरात वाढलेले नागरीकरण आणि तलावात येणारे सांडपाणी आदींमुळे तलावात जलपर्णी व अन्य अनावश्यक वनस्पतींची वाढ झाली.
जलपर्णींची अनावश्यक वाढ झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला गेला होता. परिणामी, पाण्याची गुणवत्ता तसेच जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेने पवई तलाव आणि परिसरात जैवविविधता संरक्षणाची कामे हाती घेतली. पवई तलावातून गत सहा महिन्यांत २ संयंत्राद्वारे सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे, असे असले तरीही जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलावात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णीची वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मलजल वाहिन्या अन्यत्र वळवाव्यात. जोपर्यंत ही कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती वाढवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुंबईबाहेरील क्षेपणभूमीवर विल्हेवाट
जलपर्णी काढण्याची कार्यवाही अधिक प्रभावी होण्यासाठी ५ संयंत्रांद्वारे काम अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ही कामे सुरू आहेत. त्यासाठी दोन संयंत्रांमध्ये अधिकचे मनुष्यबळ वापरण्यात येत असून पावसाळ्यानंतर ६ संयंत्रे तैनात करण्यात येणार आहेत. या जलपर्णीची मुंबईबाहेरील क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावण्यात येत आहे. तलावातील जलपर्णी काढताना जैवविविधतेस कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी ह्यबॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीह्ण या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जात आहे.