देशभरात विरोधकांची एकजूट करण्याकरता बैठकांना जोर आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानसुद्धा उपस्थित होते. या दोघांनीही ठाकरे कुटुंबियांची भेट घेऊ चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भगवंत मान म्हणाले की, “भारतात लोकशाही धोक्यात आहे, भारी धोक्यात आहे. इलेक्टेडपेक्षा सिलेक्टेड लोक देश चालवत आहेत. हे सरकार सिलेक्टेड आहे. आपल्या मर्जीचेच राज्यपाल ठेवतात. राज्यपालांविरोधात आम्हालाही सुप्रिम कोर्टात जावं लागलं. राजभवन भाजापाचे हेडऑफिस बनले आहे. तर, गर्व्हनर स्टार कंम्पेनर बनले आहेत”, अशी सणसणीत टीका भगवंत मान यांनी केली.

हेही वाचा >> Video: “आता असे दिवस येतील की…”, उद्धव ठाकरेंनी दिला गंभीर इशारा; म्हणाले, “फक्त केंद्रातच…”!

ते पुढे म्हणाले की, “ही लोकशाही नाही. भारत एक फुलदाणी आहे. प्रत्येक फुलाचा स्वतःचा रंग आहे. फुलाचा स्वतःचा सुगंध आहे. प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. भाजपा म्हणतं की जर जिंकून आलो नसतो तर पोटनिवडणुकीतून आलो असतो. नाहीतर विकत घेऊन आलो असतो. जे देश चालवाहेत तेच देशाचे खरे विरोधक आहेत. लोकशाहीची रोज हत्या होतेय. ते दिल्ली महापालिकेची निवडणुकही हरले. हळूहळू ते देशात हरायला लागले आहेत. देश वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल”, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

“आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांचं रक्त आटवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यांसाठी सैनिकांचे रक्त गेले आहे. त्यामुळे हा भारत कोणाची संपत्ती नाही की कोणीही येऊन या देशाचं मालकत्व घेईल. उद्धव ठाकरेसुद्धा पीडित आहेत. दिल्लीत बसलेले कुऱ्हाडी घेऊन बसलेत ती प्रत्येकावर चालते. उद्या येणाऱ्या पिढ्या विचारतील की लोकशाही धोक्यात होती तेव्हा तुम्ही काय करत होता, तेव्हा आपण सांगू शकतो की आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही यांच्याविरोधात एकत्र येत होतो. आम्ही आमच्या आमच्या भाषेत जनतेला समजावत होतो”, असं ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj bhavan is the head office of bjp governor punjab chief minister came to mumbai and attacked the modi government sgk