मुंबईत होत असलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आणि शिंदे गटाकडून या बैठकीवर टीका होत आहे, तर आघाडीच्या नेत्यांकडून देशात परिवर्तन होणार असल्याचा दावा केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इंडिया आघाडीच्या बैठकीवर बोलताना हे केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आल्याची टीका केली. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल देसाई म्हणाले, “‘इंडिया’ आघाडी एक पर्याय बनून समोर आली आहे. लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकच सांगतील त्यांना कोण हवं आहे आणि कोण नको आहे. देवेंद्र फडणवीसांनी राजकीय पक्षांवर अशाप्रकारची वक्तव्ये करणं हे त्यांचा आत्मविश्वास ढासळला आहे हेच दाखवत आहे.”

“‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला मुंबईत २८ पक्ष हजर”

“३० ऑगस्टला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्या उपस्थित चांगली चर्चा झाली. माध्यमांनाही माहिती देण्यात आली. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरचा कार्यक्रम कसा असेल हे ठरलं. काल २८ पक्ष मुंबईत हजर होते. बंगळुरूमध्ये २६ पक्ष उपस्थित होते.”

“देशात एक परिवर्तन येत आहे”

या बैठकीचं यजमानपद उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना चांगलं जेवण दिलं. इथं लोकांमध्ये जोरदार उत्साह आहे. देशात एक परिवर्तन येत आहे. लोकांना असुरक्षितता वाटत आहे, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न भेडसावत आहेत. त्याला इंडिया आघाडीच्या निमित्ताने एक पर्याय मिळाला आहे.

हेही वाचा : संजय राऊतांचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, म्हणाले, “मुंबईच्या संपत्तीवर…”

“महाराष्ट्रच काय देशातील सर्व राज्यांचे नागरिक निवडणुकीसाठी उत्सूक”

इंडिया आघाडीचा जोर असाच वाढत जाणार आहे. त्यांनी कधीही निवडणूक घ्यावी. महाराष्ट्रच काय देशातील सर्व राज्यांचे नागरिक निवडणुकीसाठी उत्सूक आहेत. त्यांना पर्याय हवा आहे आणि तो पर्याय इंडिया आघाडीच्या रुपाने मिळतो आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray faction leader comment on devendra fadnavis confidence pbs