वंदिता मिश्रा, शुभांगी खापरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने आपला अनेकदा विश्वासघात केला असल्याने त्या पक्षाबरोबर पुन्हा जाण्याचा प्रश्नच नाही, असे सांगतानाच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘भाजपची हमी पोकळ’ असल्याची टीका केली.  ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा नकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा केला. तसेच मोफत धान्य देण्यापेक्षा योग्य मोबदला देणारा रोजगार का देत नाही, असा सवालही त्यांनी केला. या मुलाखतीचा काही अंश..

महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणांमुळे जनतेत संभ्रम निर्माण होणार नाही का?

याची सुरुवात कुठून झाली, हे लोकांना माहीत आहे. आम्ही हिंदूत्व आणि देश या मुद्दयांवर भाजपबरोबर होतो. मग त्यांनी आमच्याशी असे का केले? २०१४मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आम्हालाही स्वप्ने पूर्ण झाल्यासारखे वाटले. पण अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चाल बदलली.. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहांनी आम्हाला विचारले ‘तुम्ही सव्‍‌र्हे केला आहे का?’ मी म्हणालो,‘आम्ही लढणारे आहोत. आम्हाला सर्वेक्षणाची गरज नाही. सर्वेक्षणात पराभव होत असल्याचे दिसल्यास तुम्ही निवडणूक लढवणे सोडणार का?’ आधी महाजन, मुंडे, गडकरी यांच्याशी शिवसेनेच्या वाटाघाटी व्हायच्या. तेव्हाही रस्सीखेच व्हायची. पण नंतर (भाजप नेते) अहंकार व आकडे दाखवू लागले. बाळासाहेब गेल्यामुळे ‘आता हल्ला करता येईल’ असा त्यांचा होरा होता. २०१९मध्ये तेच त्यांनी माझ्याबरोबर केले.  शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेन, असे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते. सेना आणि भाजप अडीच-अडीच वर्षे पद वाटून घेतील, असे अमित शहांबरोबर ठरलेही होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ते आदित्यला मुख्यमंत्री बनवून स्वत: दिल्लीत जातील. पण त्यांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटे पाडले.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : सासरे आणि दोन सुना परस्परांच्या विरोधात

मराठी अस्मिताहा मुद्दा आता कुठे आहे?

गेल्या दहा वर्षांत मोठे उद्योग कोठे गेले? आम्हाला खलनायक ठरवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला गरिबीकडे ढकलले. महाराष्ट्राकडे येऊ घातलेले उद्योग गुजरातकडे वळवले. गुजरातही देशाचाच भाग आहे. पण मोदी सरकार गुजरात आणि उर्वरित देशात भिंत उभी करू पाहत आहे. 

मोदी सरकारने देशभरात मोफत धान्य, स्वयंपाकाचा गॅस, जन धन, आयुषमान अशा योजना आणल्या..

आता त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. ते त्यांच्यावरच उलटेल. तुम्ही लोकांना मोफत धान्य देत आहात. त्यापेक्षा रोजगार का देत नाही? ते म्हणतात, तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब याच जाती ते मानतात. मग तरुणांना नोकऱ्या कुठायत? तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करता. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराबाबत अमित शहा बोलत नाहीत आणि गरीब आणखी गरीबच होत आहेत..

जोडो न्याय यात्रे’च्या निमित्ताने ‘इंडिया’ गटाने गेल्या महिन्यात मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्याचा कितपत प्रभाव पडला?

(राहुल यांच्या यात्रेपूर्वी) काँग्रेस पक्ष विखुरला गेला होता. त्याला आता ऊर्जा मिळाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत लोक बोलण्यास घाबरत होते. मात्र, आता लोकशाही धोक्यात असल्याची जाणीव त्यांनाही झाली आहे. आपल्यासाठी भाजपविरोधात लढण्यासाठी कोणीतरी आहे, असे त्यांना वाटू लागले आहे. भाजपच्या खोटया वचनांविरोधात बोलण्याचे धैर्य त्यांच्यातही आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express zws
Show comments