मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधील कोकणवासीयांनी कोकणातील गावी जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली असून त्यासाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे आरक्षित तिकीट काढण्याची धावपळ सुरू आहे. मात्र कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या काही मिनिटांतच एक हजारापार गेली आहे. तसेच इतर रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा पूर्ण झाल्याने ‘रिग्रेट’ संदेश दाखवण्यात येत आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवाशांना कोकणात जायचे कसे असा प्रश्न पडला आहे.

कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून त्यानिमित्त गावी जाणाऱ्यांची रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी धडपड सुरू आहे. रेल्वे सुटण्याच्या ६० दिवस आधीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यास सुरुवात झाली आहे. २६ जून रोजी २५ ऑगस्ट रोजी सुटणाऱ्या रेल्वेचे तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे. तर, २८ जून रोजी २७ ऑगस्टच्या रेल्वेचे तिकीट काढता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त तिकीट आरक्षण २३ जूनपासून सुरू असून, गेल्या तीन दिवसांपासून कोकणवासीय आरक्षण केंद्रावर, आयआरसीटीसी आणि खासगी संकेतस्थळावरून व अन्य पर्यायी मार्गावरून कुठूनही तिकिटे काढली जात आहेत. तसेच घर बसल्या तिकीट काढणे शक्य आहे. त्यामुळे कोकणकन्यासह कोकणातील इतर गाड्यांची तिकिटे एकाच वेळी काढण्यात आल्याने काही मिलीसेंकदाच्या फरकाने आरक्षित झाली. त्यामुळे काही मिनिटांत कोकणकन्याची एक हजारांहून अधिक तिकिटे आरक्षित झाली. तर, कोकणातील इतर एक्स्प्रेसची तिकीटे काढताना ‘रिग्रेट’ संदेश दाखवण्यात येत आहे.

कोकणातील गावांमधील सुमारे ८० टक्के तरुण शहरात राहत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणातील मूळ गावी जाण्यासाठी एकाच वेळी गर्दी होते. परंतु, त्या तुलनेत मर्यादित रेल्वेगाड्या असल्याने समस्या निर्माण होते. त्यामुळे वंदे भारत, जनशताब्दी, तेजस, तुतारी, मंगळूर अतिजलद, रत्नागिरी-दिवा, सावंतवाडी-दिवा, तिरूनेलवेली – दादर, मडगाव – वांद्रे, पुणे – एर्नाकुलम, गरीबरथ या रेल्वेगाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवण्याची आवश्यक आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

प्रतीक्षा यादीत एकूण उपलब्धतेच्या २५ टक्के इतकी मर्यादा आणल्याचे पत्र हल्लीच पाहण्यात आले होते. त्याची अंमलबजावणीही सुरू झाल्याचे मागील काही दिवसांत लक्षात आले होते. परंतु मागील दोन दिवसांत कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शयनयान डब्याला १ हजारांची आणि तृतीय श्रेणी वातानुकूलितला २५० प्रतीक्षा यादी आहे. तर, तुतारी एक्स्प्रेसच्या तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्याला १ हजार प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे एकूण ३०० च्या वर तिकिटे उपलब्ध नसताना ७५-८० च्या कित्येक पटींनी पुढे जाऊन एक हजार प्रतीक्षा यादी येतेच कशी, हा प्रश्न आहे. एकाच वेळी अनेकजण प्रयत्न करीत असल्यामुळे असे घडू शकते, हे मान्य केले तरी एकूण प्रतीक्षा यादीच्या १००-१५० च्या वर जाता कामा नये. रेल्वेच्या क्रिस आणि आयआरसीटीसीने एकत्रितपणे यावर काम करून प्रभावीपणे प्रतीक्षा यादी मर्यादेची अंमलबजावणी करावी. अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

आयआरसीटीसी हे फक्त तिकीट देण्याचे माध्यम आहे. परंतु, रेल्वे मंडळाचे नियमाप्रमाणे प्रतीक्षा यादी किती द्यावी, हे ठरविले जाते. तसेच याबाबत आयआरसीटीसी, दिल्लीमधून अधिक माहिती घेण्यात येईल.गौरव झा, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी, पश्चिम विभाग

आयआरसीटीसीच्या माध्यमातून एकाच वेळी तिकीट काढण्यात आले. त्यामुळे प्रतीक्षा यादी वाढते. आयआरसीटीसीमधील तांत्रिक बाबीमुळे असे झाले. डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे