मुंबई : राज्यावरील पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, आजमितीस ३६ पैकी १७ जिल्ह्यांत टंचाईचा प्रश्न अधिक गडद झाला आहेय त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कार्यालयात बसून नव्हे, तर थेट पाणी टंचाई असलेल्या भागांत दौरे करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. १५ जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल, असे नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधत पाणीटंचाईचा आढावा घेतला. ‘ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. यंदा उन्हाळा तीव्र आहे. त्यामुळे पुढील दोन महिने पिण्याचे पाणी जपून वापरा,’ असे आदेश शिंदे यांनी या वेळी दिले.

या वेळी प्रत्येक जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत आणि गेल्या वर्षी काय परिस्थिती होती, याचाही आढावा शिंदे यांनी घेतला. तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदा आणि मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष गावपाड्यांमध्ये भेटी देऊन पाण्याची सद्यास्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या भागात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, पाणीपुरवठा प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते.

टंचाईग्रस्त भागाशी संपर्क ठेवण्याचे निर्देश

सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ४४७ गावे आणि १,३२७ पाड्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर राज्याच्या विविध भागांत पाणीटंचाई उद्भवली असून येणाऱ्या दोन महिन्यांत प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि सातत्याने टंचाईग्रस्त भागाशी संपर्क ठेऊन सर्व्हेक्षण करावे व योग्य ती पाऊले तातडीने उचलावी. ज्या जिल्ह्यांनी कृती आराखडा सादर केला नाही त्यांनी दोन-तीन दिवसांत सादर करावा. प्रशासनाने डोळ्यात तेल घालून टंचाईला तोंड देण्याचे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाऊल टाकून काम करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणले…

● जिथे पाणी पुरवठा योजना प्रलंबित आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण करा. काही ठिकाणी लोकांना अतिशय दुरून पाणी आणावे लागते, अशा ठिकाणी तत्काळ टँकर सुरू करावे.

● आवश्यकतेप्रमाणे विहिरी अधिग्रहित कराव्यात. पाण्याचे प्रमाण कमी झाले की, स्त्रोत दूषित होऊ शकतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ते तपासण्याची गरज आहे.

● कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी वाहून नेणारे टँकरही चांगले आणि स्वच्छ असावेत . प्रत्येक टँकरवर ‘जीपीएस’ लावावे असे आदेशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water crisis in maharashtra deputy chief minister eknath shinde orders to take measures amy