गुंदवली – भांडुप संकुलदरम्यानच्या जलबोगद्याची दुरुस्ती १८ दिवसात पूर्ण

भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्यातून ठाणे येथे होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन मुंबई ३० दिवस पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र अवघ्या १८ दिवसांमध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाला यश आहे आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात रद्द करून २३ एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या जलबोगद्यास ठाणे येथील कूपनलिकेच्या (बोअरवेल) खोदकामामुळे हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. परिणामी, दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्चपासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईत ३१ मार्चपासून दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस १५ टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती. मात्र जलबोगच्या दुरुस्तीचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने ३० ऐवजी १८ दिवसांमध्ये पूर्ण केले. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरून कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, २३ एप्रिलपासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकतो, असे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Apple First Retail Store Opening: मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या अ‍ॅपल स्टोअरबद्दल जाणून घ्या ‘या’ १० प्रमुख गोष्टी

भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पाला गुंदवली – भांडुप संकुलादरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्यातून पाणीपुरवठा होतो. हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलीवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुलापासून (शाफ्ट) सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते. सुमारे १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब आतमध्ये जाऊन जलबोगद्याची दुरुस्ती करण्याचे आव्हान जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर होते.

हेही वाचा >>>राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या? अजित पवार स्पष्टीकरण देत म्हणाले…

येत्या ३ – ४ दिवसांत मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत

दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे १९ एप्रिल २०२३ पासून आवश्यक त्या झडपांच्‍या प्रचलनास तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे. जलबोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. असे असले तरी अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून जलबोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मुंबई महानगराचा पाणीपुरवठा रविवार, २३ एप्रिल २०२३ पासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे जल अभियंता विभागाने कळविले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut in mumbai will be canceled and water supply will be restored from april 23 amy