चंद्रपूर : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाची निवडणूक येत्या १९ एप्रिलला होत आहे. काँग्रेस, भाजप, वंचित तसेच इतर राजकीय पक्षांनी दिवस-रात्र एक करीत प्रचाराचा धुरडा उडविला आहे. मात्र, या निवडणूकीत राजकीय पक्षांनी युवकांना रोजगार, शिक्षण, आराेग्य, शेत मालाला योग्य भाव, कृषी सिंचन, प्रदुषण, या ज्वलंत प्रश्नांना बगल दिली आहे. प्रचारातून रोजगार, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे गायब झाले आहे.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाची निवडणूक येत्या १९ एप्रिलला होवू घातली आहे. मतदानाला केवळ तीन दिवस शिल्लक आहे. या निवडणूकीत भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर वंचितकडून राजेश बेले निवडणूकींच्या रिंगणात आहे. तसेच इतरही अपक्ष उमेदवार रिंगणात असून या उमेदवारांनी प्रचाराचा धुरडा उडविला आहे. गल्लीबोळात जावून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहे. चौका-चौकात बॅनर पोस्टर लावण्यात आले आहे. गावोगावी प्रचाररथ फिरविण्यात येत आहे. प्रचार करण्याची शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने उमेदवार व पक्षाचे कार्यकर्ते दिवस-रात्र एक करीत प्रचार करीत आहे. मात्र, या निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मुख्य प्रश्नांना बगल देण्यात आली आहे.

हेही वाचा : गडचिरोलीत स्वत:हून ‘पोस्टिंग’ घेणाऱ्या बीडीओची ‘युपीएससीत’ही भरारी…..

युवकांना रोजगार, उच्च व दर्जेदार शिक्षण, माफक दरात आरोग्य सुविधा, शेतमालाला योग्य भाव, शेतीला सिंचन, पांदन रस्ते, चंद्रपूरचे प्रदुषण यासह इतर पायाभूत सुविधा च्या प्रश्नांना प्रचारातून बगल देण्यात आली आहे. उमेदवारांनी जाहीरनामा प्रकाशित केला असला तरी, जाहीरनाम्यांची प्रचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकही आता बोलू सजग झाले आहेत. चंद्रपूर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील दहा वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प न आल्याने रोजगारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. येथील युवकांना नोकरीसाठी पुणे, मुंबईला जावे लागत आहे. तसेच शासकीय शाळांमधून उच्च दर्जांचे इंग्रजी शिक्षण, शासकीय रूग्णालयात माफक दरात उपचार, शेतीला सिंचन, शेतमालाला योग्य भाव, चंद्रपूरच्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करणारा उमेदवार हवा असल्याचे चंद्रपूर लोकसभेतील नागरिकांचे म्हणणे आहे.