नागपूर : ‘रावणाचा दहन म्हणजे एखाद्या व्यक्तीचा नव्हे, तर एका वाईट प्रवृत्तीचा अंत होय. आजही अशीच प्रतिगामी प्रवृत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजात पसरवली जात आहे. संघाचे दहा तोंड म्हणजेच दहा प्रकारची प्रतिगामित्वाची रूपे आहेत. त्या सगळ्यांचा समाजाने धिक्कार केला पाहिजे आणि त्याचे दहन व्हायला हवे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली.
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, ही दहा तोंडं दहा दिशांना नाहीत, तर संविधानविरोधी, धर्मविरोधी, लोकशाहीविरोधी अशा दहा प्रतिगामी प्रवृत्तींत लपलेली आहेत. अशा प्रवृत्तींचे दहन होणे हीच खरी विजयादशमी ठरेल. सपकाळ यांनी संविधानाच्या संरक्षणासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. आपण सर्वांनी हातात हात घालून संविधानाला अपेक्षित असलेल्या भारताच्या निर्मितीसाठी पुढे यावे, असे ते म्हणाले.
‘हम भारत के लोग’ या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेला आज सकाळी साडेसहा वाजता नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीतून जल्लोषात सुरुवात झाली. ही पदयात्रा सेवाग्राम येथील बापू कुटीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी व गांधी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.
पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, अवंतिका लेकुरवाळे, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, कुंदा राऊत यांचा सहभाग लक्षणीय होता.
‘हम भारत के लोग’ संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारीही पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेचा आरंभ ढोल-ताशांच्या गजरात व भजन मंडळींच्या भक्तिगीतांनी झाला. संपूर्ण मार्गात हरे राम हरे कृष्ण, देवकीनंदन गोपाला, “वोट चोर गद्दी छोड़”, “संविधान बचाओ”, “लोकशाही वाचवा”, अशा घोषणा देण्यात येत होत्या. या घोषणांमधून सरकारविरोधी भावना आणि संविधान रक्षणाबाबत जनजागृतीचा स्पष्ट संदेश दिला जात होता.
ही पदयात्रा नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू होऊन विविध गावांतून आणि शैक्षणिक संस्थांमधून जात सेवाग्रामच्या बापू कुटीत पोहोचणार आहे. बापूंच्या स्मृतींना वंदन करत संविधान, अहिंसा, समानता आणि न्याय या मूल्यांची पुनःप्रस्थापना करण्याचा उद्देश या यात्रेमागे आहे.
सेवाग्राममध्ये पदयात्रेच्या समारोपाच्या वेळी विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संविधानाच्या मौल्यवान मूल्यांची आठवण करून देणारे सत्रही आयोजित केले जाणार आहे.
ही पदयात्रा केवळ चालण्याचा कार्यक्रम नसून, ती एक वैचारिक चळवळ आहे. देशातील सध्याच्या राजकीय व सामाजिक वातावरणात नागरिकांमध्ये संविधान आणि लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही यात्रा समाजाला एक प्रेरणादायी दिशा देईल, असा विश्वास सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.