नागपूर : महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि संस्कृतीचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यांची धैर्य, नेतृत्वगुण आणि न्यायप्रियता महाराष्ट्रातील लोकांसाठी प्रेरणादायक आहे. शिवाजी महाराजांनी जनतेच्या मतांवर भर देऊन स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासात एक आदर्श राजा म्हणून ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला. हा दिवस मराठी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गौरवशाली घटना मानली जाते. या दिवशी शिवाजी महाराजांचा विधीपूर्वक अभिषेक झाला आणि त्यांनी औपचारिकपणे ‘छत्रपती’ ही उपाधी धारण केली. शिवप्रेमी दरवर्षी ६ जूनला मोठ्या जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. मात्र यंदा हा सोहळा तिथीप्रमाणे ९ जून रोजी साजरा करण्यात यावा अशा आशयाचे परिपत्रक राज्याच्या विधी व न्याय विभागाने शुक्रवारी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने हा निर्णय घेतला गेला असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तिथीनुसार साजरा करा
सरकारी व शैक्षणिक संस्थांमध्ये ६ जूनच्या दिवशी विशेष कार्यक्रम, व्याख्याने व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिनांकाबाबत तारीख आणि तिथी यामध्ये काही प्रमाणात गोंधळ व मतभेद आढळतो. ऐतिहासिक दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता. ही तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार निश्चित करण्यात आलेली असून, सरकारी दस्तावेज आणि बहुतेक शालेय-पुस्तकांमध्ये याच तारखेचा उल्लेख आढळतो. मात्र, हिंदू पंचांगानुसार हा अभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला झाला होता. चंद्रमान पंचांगामुळे ही तिथी दरवर्षी बदलते आणि कधी ५ जून, कधी ७ जून किंवा इतर तारखेला येते. त्यामुळे काही ठिकाणी राज्याभिषेक दिन पंचांगानुसार साजरा केला जातो. यंदा तिथीनुसार राज्याभिषेक दिन ९ जून रोजी येत आहे. या पार्श्वभूमीवर २ जून २०२५ रोजी बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या सदस्याने तिथीनुसार राज्याभिषेक साजरा करण्याबाबत पत्र पाठविले होते. विधी व न्याय विभागाने ५ जून रोजी याबाबत पत्र पाठविले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता प्रदान केल्यावर ६ जून रोजी कार्यासन अधिकारी वैशाली बारुडे यांच्या नावाने परिपत्रक काढले गेले. परिपत्रकानुसार, राज्याच्या न्याय व विधी विभागाच्या अंतर्गत येणारे सर्व कार्यालये तसेच राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालयात, सरकारी वकीलांच्या कार्यालयात ९ जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे.