गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे गेल्या आठवड्यापासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. नळाला पाणी येण्याचा वेळ, प्रमाण आणि दाब अनियमित असल्याने गावातील महिलांचा रोजचा पाण्यासाठी लढाच सुरू आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर आज शुक्रवार, २५ एप्रिल रोजी गावातील महिलांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून घागर मोर्चा काढला.

सामाजिक कार्यकर्ते रेवचंदजी शहारे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर जोरदार मोर्चा निघाला. या वेळी महिलांच्या हातात घागरी, डोक्यावर पाण्याचे हंडे, आणि मुखात संतप्त घोषणा या दृश्याने संपूर्ण नवेगावबांध दणाणून गेले. ‘पाणी आमचं हक्काचं… नाही कुणाच्या बापाचा!’, ‘ग्रामपंचायत जागी हो!’, ‘पाणी नाय, तर मत नाय!’ अशा प्रकारच्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमला.

नवेगावबांध ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज लांब अंतर पार करावे लागत आहे. काही ठिकाणी पाण्याचा नळ आठवड्यातून एकदाच चालू होतो, तर काही ठिकाणी पाणीच पोहचत नाही.या मुळे घरातील वृद्ध, लहान मुलं, आजारी व्यक्ती – सगळ्यांनाच या संकटाचा फटका बसतोय. या मोर्चात सहभागी झालेल्या एक महिलेनं म्हटलं, ‘घरात लहान मुलं रडतात, आणि आम्ही नळ कधी येतो याची वाट बघत उभ्या राहतो. पण प्रशासनाला याचं काहीच सोयरसुतक नाही. ’ग्रामपंचायत कार्यालयात महिला मोर्चेकर्‍यांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसचिवांना निवेदन दिलं.

पाणीपुरवठा सुरळीत करावा, प्रत्येक वॉर्डात नियमित पाण्याची सोय व्हावी, टँकर वापरून तातडीची उपाय योजना करावी, अशी मागणी करण्यात आली. या नंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून ‘लवकरच उपाययोजना करू’ असं आश्वासन दिलं गेलं, पण ग्रामस्थांमध्ये विश्वासाचा अभाव दिसून आला. अनेकांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ‘हा प्रश्न केवळ पावसाळ्या पुरता सोडवायचा नाही, तर वर्षभरासाठी कायमस्वरूपी उपाय हवा.’ हा मोर्चा गावकर्‍यांच्या सहनशीलतेचा उद्रेक होता. तीव्र पाणी टंचाईचा सामना करणार्‍या येथील प्रभाग क्रमांक चार, पाच, सहा, दोन या प्रभागातील आबालवृद्ध, विद्यार्थिनी, महिला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या.

प्रसंगी उपसरपंच रमण डोंगरवार, ग्रामविकास अधिकारी विलास रामटेके यांच्याशी महिला मोर्चेकर्‍यांनी चर्चा केली. उद्याला प्रत्येक प्रभागामध्ये पिण्याचे पाणी मिळण्याची व्यवस्था आपण करू,असे आश्वासन ग्राम विकास अधिकारी रामटेके यांनी ग्रामपंचायतीत धडकलेल्या संतप्त महिलांना दिले. उद्यापासून ही पाण्याची समस्या संपुष्टात आली नाही, तर आणखी आम्ही घागर मोर्चा घेऊन येऊ व तीव्र आंदोलन करू असा कडक इशारा यावेळी संतप्त मोर्चेकरी महिलांनी दिला आहे.

यावेळी घागर मोर्च्यात रेवचंद शहारे , कला डोंगरवार, प्रियंका मस्के, फुला बडोले, वेणू तलांजे, आर्या मस्के, मालन मेश्राम, तारा मेश्राम, शिशु लोगडे या मोर्चेकरी महिला यांनी पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी या प्रसंगी केली.

पाणी टंचाई समस्येमुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो परंतु याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष व हलगर्जीपणा दिसून येतो. या मुळे अखेर महिलांना घागर मोर्चा काढावाच लागला. आता तरी ग्रामपंचायत याकडे लक्ष देऊन पाणी समस्या दूर करेल अशी अपेक्षा आहे. ही समस्या कायम राहिली तर यानंतर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. – रेवचंद शहारे, सामाजिक कार्यकर्ते, नवेगावबांध.