लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : महाराष्ट्रासह देशातील लाखो हत्तीरोग बाधितांना ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य, आयुश, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी देशातील आरोग्य यंत्रणांना आज दिले. याचा शुभारंभ बुलढाण्यातून करण्यात आला. जिल्ह्यातील एका हत्तीरोग बाधित महिलेला आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते आज अपंगत्वाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा शुभारंभ आज राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला. मेहकर येथील महाराष्ट्र अर्बन बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

आणखी वाचा-चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

या शुभारंभपर कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव वंदना यांच्यासह बिहार, झारखंड, ओडीसा, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, या राज्याचे आरोग्यमंत्री तसेच ग्रामविकास, कृषी महिला व बाल कल्याण, शिक्षण, अल्पसंख्याक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले. दृकश्राव्य पद्धतीने या बैठकीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना यावेळी जाधव यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील तब्बल २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आहे. या राज्यांत ‘लिम्फैटिक फाइलेरियासिस’ अर्थात हत्तीरोगाचे साडेसात लाख रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या रोगाने बाधित रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र शासन आणि आरोग्य मंत्रालय कटिबद्ध आहे. हत्तीरोग हा आजार कायमस्वरूपी असल्याने बाधित रुग्णांना ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे, असे आदेश त्यांनी आरोग्य यंत्रणांना दिले. यामुळे अशा रुग्णांना ४५ टक्के अपंगत्वाचे इतर लाभ सुद्धा मिळू शकतील. याचा शुभारंभ याच कार्यक्रमात करण्यात आला. ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील एका हत्तीरोगग्रस्त महिलेला देण्यात आले.

आणखी वाचा-यवतमाळ : थॅलेसेमिया, सिकलसेलचे १५ हजार रुग्ण, सुविधांअभावी पाच दगावले?

पंचमुखी योजना

यावेळी नामदार प्रतापराव जाधव म्हणाले की, देशातून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. मागील वर्षी सन २०२३ पासून केंद्र सरकारच्यावतीने पंचमुखी रणनीती योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत या रोगाचा प्रसार थांबण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात बाधित क्षेत्रात मोहीम स्वरूपात नागरिकांमध्ये करण्यात येते. मागील वर्षी या अभियानाला बाधित क्षेत्रातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जवळपास ८२ टक्के लोकांपर्यंत हे अभियान पोहचले होते. यावर्षी ‘एमडीए’ अभियानाच्या पहिल्याच टप्प्यात अकरा राज्यातील ९६ जिल्ह्यातील ९५ टक्के लाभार्थ्यांपर्यंत या प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

भविष्यात हत्तीरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन बाधीत क्षेत्रातील प्रत्येकानी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डासाच्या दंशाने हत्तीरोग होत असल्याने मच्छरदाणीसारख्या बचावात्मक संसाधनाच्या उपयोगासंदर्भात सरकारच्यावतीने सकारात्मक भूमिका घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनात भारत चिकित्सा सेवा ही सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीचा पल्ला गाठत असल्याचे जाधव यावेळी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give disability certificate to elephant disease sufferers directive of union minister of state for health scm 61 mrj