अकोला : जिल्ह्यात ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला. पावसामुळे ३१३ घरांची पडझड झाली. मदत व बचावकार्य पथकाकडून करण्यात येत आहे. रविवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला जिल्ह्यात २२ जुलैला १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. तेल्हारा तालुक्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीला पूर आला होता. या पुरात वाहून गेलेल्या अंकित संग्राम ठाकूर (३२) या तरुणाचा मृतदेह रविवारी आढळून आला. जिल्ह्यात एकूण ३१३ घरांचे नुकसान झाले. ३११ घरांचे अंशत: तर दोन घरे पूर्णपणे पडली आहेत. यामध्ये सर्वाधिक बाळापूर तालुक्यातील २०५, अकोट ९०, अकोला १८ व बार्शिटाकळी तालुक्यातील सात घरांचा समावेश आहे.

हेही वाचा – नोकरभरतीच्या कठोर कायद्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे ‘टि्वटर वॉर’ आंदोलन; जाणून घ्या सविस्तर…

तेल्हारा तालुक्यातील एका जनावराचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ३०६ गावांतील ४७ हजार ७७७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. बाळापूर तालुक्यातील झुरळ गावातील पक्का ४० फूट मार्ग, टाकळी ते निमकर्दा दरम्यान ५० फुटाचा रस्ता आणि वारुळा ते तेल्हारादरम्यानचा पूल वाहून गेला.

हेही वाचा – बुलढाणा: वडाळा येथे दरोडा; दागिन्यासह रोख लंपास, महिला जखमी

आगर येथील आजारी मुलगी आनंदी प्रदीप गव्हाळे हिला उगवा ते आगर दरम्यान तीन कि.मी. बोटद्वारे सुरक्षित बाहेर काढण्यात आले. शहरातील ठोक किराणा बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola district crops on 47 thousand hectares are in water double sowing crisis on farmers ppd 88 ssb