वर्धा : धान्याचा ठणठणाट असल्याने मुलांना पोषण आहार द्यायचा कसा, असा मोठा पेच मुख्याध्यापकांकडे उभा ठाकला आहे. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहारासाठी चालू महिन्याचा तांदूळ तसेच धान्यादी मालाचा पुरवठा अद्याप शाळांना झालेला नाही. तसेच अनेक शाळात दैनदिन नोंदीनुसार हा माल संपलेला आहे. चुल पेटणार कशी, हा प्रश्न पुढे आला आहे.
विद्यार्थ्यांना पोषण आहार दररोज देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. या पार्श्वभूमीवर धान्याचा ठणठणात शाळांची स्थिती बिकट करणारा ठरतो. नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांचा पुरवठा झालेला नाही.शाळांना धान्यादी माल न मिळाल्यास मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी आपल्या स्तरावर तजवीज करावी. उधारीवर माल आणून पोषण आहार दिला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवल्या जाते. मात्र तसे कुठेही नमूद नसल्याचे शिक्षक म्हणतात.
हेही वाचा : सायबर क्राईमच्या नाना तऱ्हा, यवतमाळ जिल्ह्यात ५३ सायबर गुन्ह्यांची नोंद
आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची आणि अपवादात्मक स्थितीत विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी तजवीज करण्याबाबत प्रशासनाने लेखी सूचना देणे आवश्यक आहे. मात्र अद्याप तश्या सूचना आलेल्या नाही. सूचना नसल्याने उसनवारीने पोषण आहार देणे अनाकलनीय आहे. लेखी निर्देश नसतांना तजवीज केल्यास झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती कशी करणार, असा शिक्षकांचा सवाल आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची सही घ्यावी. तांदूळ आणि धान्यादी माल संपल्यामुळे पोषण आहार शिजवून देणे शक्य नाही आणि आवश्यक मालाचा पुरवठा तातडीने करण्याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र द्यावे, अशी भूमिका घेण्याचा निर्णय राज्य प्राथमिक शिक्षण समितीने घेतला आहे. पोषण आहार नियमीत देणे अनिवार्य असले तरी त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांपेक्षा शासन व प्रशासनाची अधिक असल्याचा सूर आहे.
हेही वाचा : धक्कादायक… प्रसूतीदरम्यान नवजात बाळासोबत ४ किलोचा ट्युमरही आला बाहेर! पुढे काय झाले? वाचा…
शिक्षक समितीचे नेते विजय कोंबे म्हणाले की आहारापासून एकही विद्यार्थी वंचीत राहू नये हे मान्य. मात्र अद्याप मालाचा पुरवठा झालेला नाही. म्हणून तजवीज करण्यासाठी आवश्यक लेखी सूचना देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आहार शिजवून देणे शक्य नसल्याचे पत्र पंचायत समितीकडे देण्याचे आवाहन आम्ही केले आहे. प्राप्त माहितीनुसार धान्य पुरवठादाराचा कंत्राट रद्द झाल्याने ही आपत्ती ओढविली आहे.