नागपूर : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाच्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसला कायम लक्ष्य केले जाते. मात्र, आजही आमच्या अनेक लोकांना मंदिरात प्रवेश नाही, सार्वजनिक पाणी स्थळावर बंदी आहे तर, घोडय़ावरून वरात काढली म्हणून दलित मुलाला मारहाण केली जाते. मोदी सरकार दलित विरोधी असल्याने अशा सरकारच्या काळात आम्ही मंदिराच्या उद्घाटनाला कसे जाणार? असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ गोळीबार चौक येथे खरगे यांची सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. खरगे म्हणाले, की आम्ही धर्माच्या विरोधी नाही. प्राणप्रतिष्ठेचे काम साधू, संत करतात. मात्र, मोदी नवीन साधू झाले आहेत. कधी समुद्राच्या आजूबाजूला फिरतात तर कधी डुबकी लावताना दिसतात आणि आम्हाला राम विरोधी म्हणतात. अयोध्येला का आले नाही, असा सवाल मोदी करतात.

हेही वाचा >>>बहुमत मिळाले तर आरक्षण रद्द होणार का? राहुल गांधींच्या टीकेला अमित शाहांचे उत्तर, आंबेडकरांचा केला उल्लेख

मात्र, दलित विरोधी सरकारच्या काळात आम्ही मंदिराच्या उद्घाटनाला कसे जाणार? असा प्रश्न खरगे यांनी केला. देशातील सर्व दलित, वंचितांना राम मंदिरात प्रवेश मिळेल तेव्हाच मी अयोध्येला जाणार असेही खरगे म्हणाले. नवीन संसद भवनाच्या भूमिपूजनाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांना बोलावले नाही, उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नाही. त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाला नेले नाही. हा दलित आणि आदिवासी राष्ट्रपतींचा अपमान आहे. मोदींनी मतांचे राजकारण करण्यासाठी खेळ थांबवावे अशी टीकाही खरगे यांनी केली.

शहा यांच्याकडे भ्रष्टाचाऱ्यांना धुवून काढणारी ‘लॉन्ड्री’

आज ‘मोदींची गॅरन्टी’ असा प्रचार केला जातो. मग दहा वर्षे कुणाची ‘गॅरन्टी’ होती. विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप मोदी करतात. परंतु, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते अशा २३ लोकांना मोदी भाजपमध्ये घेऊन गेले. अमित शहा यांच्याकडे देशातील सर्वात मोठी ‘लॉन्ड्री’ आहे, अशी टीका खरगे यांनी केली.