MPSC Exam 2025 Dates: नागपूर: मराठवाडा परिसरात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यास साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.
येत्या २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे तसेच केंद्रांवर वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे की राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल. ही बाब सार्वजनिक हिताची असल्याने आपण आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या अडचणी प्रकाशझोतात आणून शासन व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून द्यावे, ही नम्र विनंती, अशी मागणी मराठवाड्यासह विदर्भ, नागपूर आणि इतर भागातील विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. मात्र या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नसला तरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, अधिपत्याखालील शासकीय / दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर सुरु आहे.सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवडयापासून अती मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये अपात्कालीन पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने २५.०९.२०२५ व २६.०९.२०२५ रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबरला होणारा आहे. मात्र अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतरच्या या पहिल्याच परीक्षेवर विघ्न येण्याची शक्यता आहे. राज्यभरातील लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. ऐन परीक्षा तोंडावर आली असतानाच राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे.
या संदर्भात एमपीएसीचे काय म्हणणे आहे पाहूया…
आयोगाने यंदा २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहे. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. त्यामुळे विद्यार्थी सातत्याने या परीक्षेच्या जाहिरातीची चातकाप्रमाणे वाट बघत होते. परंतु, आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत होता. मागील काही महिन्यांपासून ‘एमपीएससी’च्या अनेक परीक्षांचे निकाल मुलाखती रखडल्याची उमेदवारांची ओरड आहे. त्यात राज्यसेवेची जाहिरातही येत नसल्याने आयोग नेमका कुठला ब्रह्ममुहूर्त शोधत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर आयोगाने ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आता २८ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे.