नागपूर : तळकोकणात अडकलेला मान्सून काल विदर्भातील काही भागांत बरसला. आता पुढच्या आठवड्यात राज्यातील आणखी काही भागांत तो प्रगती करेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. येत्या सोमवार आणि मंगळवारी मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता शुक्रवारी खात्याने वर्तवली.
२३ जूनला विदर्भाच्या काही भागांत मान्सूनने दाखल झाला आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. कोकण किनारपट्टीवर पश्चिमी वाऱ्यांमुळे सध्या तापमान वाढले आहे. साधारणपणे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारे प्रवास करतात, पण सध्याच्या परिस्थितीत रात्रीही समुद्रावरूनच वारे येत आहेत. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला आहे.
हेही वाचा – वर्धा : काँग्रेसचा मोठा मासा राष्ट्रवादीच्या गळाला, हिंगणघाट क्षेत्रात काँग्रेसला झटका
मुंबईत सोमवार, मंगळवार ‘येलो अलर्ट’
हवामान खात्याने मुंबईत सोमवार आणि मंगळवारी ‘यलो अॅलर्ट’ दिला आहे. या दोन्ही दिवशी मुंबई व ठाण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यासाठीही मंगळवारी यलो अॅलर्ट आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये आज, शनिवारपासून मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्गातही सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.