नागपूर : ‘ईव्हीएम’च्या बळावर सत्तेत आलेले राज्यातील सरकार दलित आणि शेतकरीविरोधी आहे. परभणी येथे पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांवर अत्याचार सुरू आहे. एका आंदोलकाचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली जाते. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली असून सरकारचे आरोपींना पाठबळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन अल्पदिवसाचे असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अमरावती : रवी राणांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची हुलकावणी

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर अनेक आरोप करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आव्हाड, आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू आदींची उपस्थिती होती. परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या ‘कोंबिग ऑपरेशन’ दरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सोमवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला. अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री मात्र मिरवणुकीत गुंतले आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सोयाबीन, कापसाला भाव न देणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार असल्याची टीकाही दानवे यांनी केली. संख्याबळ कमी असले तरी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सभागृहात ताकदीने मांडणार असेही दानवे म्हणाले. यावेळी आमदार महेश सावंत, आमदार ज. मो. अभ्यंकर हे उपस्थित होते.

हेही वाचा >>> भंडारा : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नरेंद्र भोंडेकरांचा पदाचा राजीनामा

बीडच्या घटनेची सीबीआय चौकशी करा

शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. बीडमध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. बीडमध्ये दोन वर्षांत ३२ हत्या झाल्या आहे. आरोपीला राजकीय वरदहस्त आहे. बीडमध्ये जंगलराज सुरू आहे. त्यामुळे बीडच्या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची चौकशी समिती नेमावी अशी मागणीही विरोधकांनी केली.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीला निमंत्रण नाही

मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर रविवारी नागपुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याचे विरोधकांना निमंत्रण दिले नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. सरकारने कुणाला मंत्रिपद द्यावे हा त्यांचा परस्पर निर्णय आहे. काँग्रेसचा गटनेता हा १७ तारखेला ठरेल असेही पटोले म्हणाले. विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात पहिले अधिवेशन असताना, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केला आहे. अधिवेशन कालावधी कमी असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition mva to boycott maharashtra governments legislature session eve tea party dag 87 zws