यवतमाळ : इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सर्वत्र सुकाळ आल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे. यातूनच विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी अनेक अफलातून कल्पना पुढे येत आहे. उमरखेड तालुक्यातील पोफाळी ग्रामपंचायतने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास चालू वर्षाचा पाणी आणि मालमता कर माफ करण्याचा ठराव घेतला. या अभिनव निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

पोफाळी येथे जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. यापैकी पोफळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी व वसंतनगर पोफाळी विद्यालयात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. परंतु, प्रवेशाअभावी या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचे चित्र आहे. यामागे इंग्रजी भाषेचे वाढते आकर्षण कारणीभूत असल्याचे शिक्षक सांगतात. पूर्वी खेडोपाडी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या मोठी होती. परंतु, अलीकडच्या काळात शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात जिल्हा परिषदांच्या शाळा पटसंख्येच्या बाबतीत माघारल्याचे वास्तव आहे.

पोफाळी ग्रामपंचायतीने मात्र यावर उपाय शोधून गावातील नागरिकांना कर माफी देण्याचा ठराव घेतला. या प्रयोगाने जिल्हा परिषदेच्या शाळांना नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने करमाफीतून विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न चालविले आहे. सेवानिवृत्त शिक्षक तथा ग्रामपंचायतीचे सदस्य शंकर हाके यांच्या संकल्पनेला ग्रामपंचायतीच्या १५ सदस्यांनी संमती दर्शविली. हा ठराव बैठकीत पारीत झाला. पोफाळी वसंतनगर शाळेत नवीन प्रवेश घेतल्यास पालकांचा २०२५-२६ या वर्षाचा घरपट्टी व पाणीपट्टी कर पूर्णपणे माफ करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

गावातील विद्यार्थ्याने शाळा सोडून शिक्षणासाठी परगावी जाऊ नये, शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारला जावा तसेच मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व पालकांना कळावे, हा यामागचा उद्देश आहे. कर माफ करून पटसंख्येसाठी प्रयत्न करण्याचा पहिला बहुमान पोफाळी ग्रामपंचायतीने मिळविला आहे. शिक्षण विभाग व गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही हा ठराव घेतला आहे. या ठरावातून विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढेल, असा विश्वास पोफाळीच्या सरपंच रेखा क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

मराठी शाळांचा वाचविण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना भरती यावी, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारला जावा या उद्देशातून ही संकल्पना राबविली जात आहे. गावोगावी याविषयी जनजागृती केली जात आहे, असे पोफाळीचे ग्रामसेवक ओमप्रकाश कोथळकर यांनी सांगितले.

मातृभाषेतूनच व्हावे प्राथमिक शिक्षण

मूल गर्भात असताना त्याच्यावर आसपासच्या भाषेचे संस्कार होत असतात. त्यानंतर जन्मानंतरसुद्धा तीच बोलीभाषा त्यांच्या कानावर पडते आणि प्रत्यक्षात बोलता आल्यावरही ती मातृभाषा बोलतात. या साऱ्या टप्प्यानंतर मात्र शाळेत इंग्रजी ही नवी भाषा त्यांच्या शालेय जीवनात येते. या भाषेत समायोजन करताना त्यांना अडचणी येतात. मेंदूतील ‘टेम्पोरल लोब’ हा भाग भाषा शिकण्यासाठी असतो, या भागाला जुन्या भाषेची संवेदना लवकर कळते. त्यामुळेच प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यायला हवे, त्यानंतरच दुसरी भाषा अवगत करता येते, असे यवतमाळ येथील बाल मनोशास्त्रज्ञ तरुलता श्रीरामे यांनी सांगितले.