लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : जिल्ह्यात रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळी वादळाचा ९६ पेक्षा अधिक गावांना जबर फटका बसला. या वादळात वीज कोसळून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना दारव्हा तालुक्यातील लोही येथे घडली. बाळू लक्ष्मण पुंड (३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सहा तालुक्यात वीज कोसळल्याने १२ जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास आठ हजार ३२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महसूल व कृषी विभागने सोमवारी दिवसभर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. त्यातून ही माहिती पुढे आली. वादळाचा सर्वाधिक तडाखा आर्णी, मारेगाव, उमरखेड, दारव्हा या तालुक्यांना बसला आहे. वीज पडल्याने दिग्रस, मारेगाव तालुक्यात प्रत्येकी तीन जनावरे दगावली. तर वणी, झरी जामणी येथे प्रत्येकी एक, दारव्हा व राळेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन अशी एकूण १२ जनावरे मृत्युमुखी पडली. अवघ्या काही तासांत सरासरी ९.७ मिमी पाऊस कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे १३२ घरांवरील टीनपत्रे उडून गेली. यात सर्वाधिक नुकसान आर्णी तालुक्यात झाले असून येथे १२१ घरांवरील छप्पर उडाले. तालुक्यातील जवळा, लोणी, खंडाळा, देवगाव, अकोला, खेड, बीड, तरोडा, गणगाव, उमरी पठार, शिरपूर, ब्रामहणवाडा, सेलू, गवणा, काकडदरा, चांदणी, देऊरवाडी, दत्तरामपूर, उमरी इजारा, तेंडोळी, नवनगर, अंतरगाव, कापरा, केळझरा खंड एक अशा २९ गावांमध्ये घरांचे नुकसान झाले. मारेगाव तालुक्यातील २३ गावांत, उमरखेड तालुक्यातील २७, तर दारव्हा तालुक्यातील २१ गावांमध्ये वादळामुळे घरांचे नुकसान झाले.

आणखी वाचा- ‘लव्ह, सेक्स, धोका…’ पती-पत्नीतील बेबनाव दूर करण्याच्या बहाण्याने सात वर्षांपासून शोषण

अवकाळी पावसाने आर्णी तालुक्यातील सर्वाधिक तीन हजार २१० हेक्टर- वरील गहू, हरभरा, तीळ, ज्वारी, संत्रा या पिकांचे नुकसान झाले आहे. उमरखेडमध्ये दोन हजार २७५ हेक्टर, दारव्हा तालुक्यातील एक हजार ८४६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ, बाभूळगाव, केळापूर, दिग्रस, झरी, कळंब पुसद या तालुक्यांमध्येही पपई, गहू, ज्वारीसह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी वीज खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अनेक गावातील वीज आणि पाणी पुरवठा बंद आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rains hit 96 villages in yavatmal district one man died 12 animals died nrp 78 mrj