चंद्रपूर: बल्लारपूर पेपर मिलपासून तर सिमेंट, पोलाद व वीज उद्योग एकट्या वर्धा नदीच्या पात्रातून पाणी उपसा करत आहे. त्यामुळे वर्धा नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नदीतील पाणी उद्योग पळवत असल्याने गावात पाणी मिळणे कठीण झाले आहे. गावे तहानलेली आहेत. तसेच उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रोजगार दिला जात नाही. त्यामुळे उद्योगांना तीव्र विरोध आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडत बेलसणी व मुरसा येथील मेसर्स मिलीयन स्टील प्रा. लिमिटेड कंपनीला तीव्र विरोध केला. आजच्या जनसुनावणीत गावचे सरपंच व नेते सोडले तर ८० टक्के ग्रामस्थांनी विरोध केल्याने जनसुनावणी चांगलीच गाजली.

भद्रावती तालुक्यातील मुरसा व चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी या दोन गावातील शेतजमिनीवर मेसर्स मिलियन स्टील प्रा. लिमिटेड या कंपनीचा ४३२ कोटीचा स्पंज आयरन, ३० मेगावॅट वीज प्रकल्प येत आहे. कंपनीच्या प्रस्तावित जागेवर बेलसणी येथे शुक्रवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरणविषयक जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला.

महाराष्ट्र प्रादेशिक नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीत मुरसा, बेलसनी, घुग्घुस, शेणगाव, येरूर, साखरवाही, म्हातारदेवी, ताडाली सह अन्य गावातील नागरिक शेतकरी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कंपनीने जनसुनावणीची माहिती ही गावात दवंडी फिरवून द्यायला पाहिजे होती. मात्र, कंपनीने लपवाछपवीचे धोरण अंगीकरल्याने नागरिकांना जनसुनावणीची माहितीच मिळाली नाही, असा आरोप करीत ग्रामस्थांनी जनसुनावणीत संताप व्यक्त केला.

स्थानिकांना रोजगार उद्योग क्षेत्रातील संपर्कात येणाऱ्या गावांना दत्तक घेणे, कंपनीच्या वतीने रुग्णालय, शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देणे, शेत पाणंद रस्ते बनवणे, गावामध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवणे व गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवणे, तसेच ग्रामपंचायतला दरवर्षी सीएसआर फंड देण्यात यावा ही प्रमुख मागणी नागरिकांच्या वतीने ठेवण्यात आली.

जनसुनावणीस उपस्थित नागरिकांपैकी ८० टक्के नागरिकांचा उद्योगाला विरोधच दिसून आला. या जिल्ह्यात बहुतांश उद्योग वर्धा नदीवर आहेत. त्यामुळे वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा उद्योग देखील वर्धा नदीतूनच पाण्याचा उपसा करणार आहे. यावर्षी चंद्रपूर एमआयडीसीतील उद्योग पाण्यामुळे पाच दिवस बंद होते. शेवटी मारडा येथून पाणी आणावे लागले. त्याच उद्योगांना पाणी मिळत नाही, तेव्हा नवीन उद्योगांना पाणी कसे मिळणार? किमान वर्धा नदीवर बॅरेज तयार करावे, अशीही मागणी एमआयडीसी इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनी लावून धरली.

प्रदूषण, रोजगाराचा मुद्दाही महत्त्वाचा

आम्ही उद्योगाचे स्वागत करतो, मात्र पाणी प्रश्न जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढावा. प्रदूषण व रोजगाराचा मुद्दाही ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित करत उद्योगाला तीव्र विरोध केला. काही निवडक सरपंच व नेते सोडले तर गावातील बहुसंख्य नागरिकांनी उद्योगाला विरोध केल्याचे चित्र येथे दिसून आले.