नाशिक: मी नशिकचा बालक आहे. हे पद कधीही कोणी काढून घेऊ शकत नाही. पालक नसलो तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी फलकबाजी करून वादविवाद वाढवू नये, अशा कानपिचक्या छगन भुजबळ यांनी पदाधिकारी आणि समर्थकांना दिल्या. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप याच्या वादात गिरीश महाजन यांचे नांव जाहीर होऊन स्थगितीही द्यावी लागली होती. आता भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर अजित पवार गटाकडून पुन्हा त्यावर दावा सांगितला जात आहे. या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात अनेक भागात भुजबळांना पालकमंत्री करावे म्हणून फलक लावले आहेत. यावर गुरुवारी नाशिकमध्ये आलेल्या भुजबळांनी भाष्य केले. कार्यकर्त्यांना वाद आणखी वाढवू नये, अशी सूचना केली.
नाशिक ही आपली जन्मभूमी आहे. शिक्षण आणि राजकारण मुंबईत झाले तरी जन्मभूमीवर आपले प्रेम असते. २००४ पासून नाशिक जिल्ह्यातून आपण निवडून येत आहोत.
पालकमंत्री नसलो तरी स्थानिक प्रश्नांची सोडवणूक ही आपली जबाबदारी आहे. नागरिकांनी सूचना केल्यास योग्य ठिकाणी त्याचा आग्रह धरून पाठपुरावा केला जाईल. पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. आपली कामे योग्य ठिकाणी करून घेणे हे महत्वाचे असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले.