जळगाव – जिल्ह्यातील शेतकरी सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीतून सावरत असतानाच, पाडव्याच्या दिवशी बुधवारी दुपारी बऱ्याच ठिकाणी पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. रब्बीच्या पेरण्यांची घाई करणाऱ्या शेतकऱ्यांची त्यामुळे मोठी तारांबळ उडाली.
आग्नेय अरबी समुद्रात, लक्षद्वीप तसेच केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू वाढत असल्याचे हवामान खात्याच्या निरीक्षणात आले आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि आसपासच्या भागात आणखी एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, ते तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकत आहे.
या प्रणालीची तीव्रता पुढील काही तासांत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण अंदमान समुद्र परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती दिसून येत आहे, ज्यामुळे नव्या कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढून पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.
तसेच वातावरणातील उकाडा कायम असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटेचा गारवा देखील वाढू लागला आहे. अशा स्थितीत, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. ज्वारी, हरभरा, मका पेरणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची त्यामुळे धावपळ उडाली.
कमी-जास्त पाऊस झाल्यास जमिनीतील वाफसा स्थिती संपून रब्बीची पेरणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून मदतीची घोषणा केली असली, तरी दिवाळीपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही.
दरम्यान, जिल्ह्यात उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी आणि मका यांसारखी खरीप पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामात कोरडवाहू तसेच बागायती पिकांची पेरणी केली जाते. साधारणपणे ही पेरणी दसरा आणि दिवाळीच्या सुमारास पूर्ण होते. मात्र, यंदा परतीच्या पावसाचा जोर नेहमीपेक्षा जास्त राहिल्याने रब्बीच्या पेरणीला आधीच विलंब झाला आहे. तरी देखील हवामानातील सुधारलेल्या स्थितीमुळे आणि शेतकऱ्यांच्या तयारीमुळे यंदा रब्बी पिकांची पेरणी उशिरा का होईना वेगाने सुरू झाली आहे.
सप्टेंबरमधील पावसाने मागील तीन महिन्यांची तूट भरून काढल्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद घेतली गेली आहे. त्यात आता पुन्हा दिवाळीला पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बीच्या पेरणीचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.