लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नशिराबाद येथे ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावात महिनाभरातून अवघे तीन वेळा तासभर पाणी मिळते. त्यामुळे दैनंदिन कामे सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी नशिराबादकरांनी पाणी द्या… पाणी द्या… असा टाहो फोडत घागर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांकडून मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन यांनी केले. सय्यद बरकत अली, देवेंद्र पाटील, सादिक शाह, विनोद रंधे, शेख अय्युब आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. शहराच्या आजूबाजूला असलेल्या जलस्त्रोतातून शहराची तहान भागेल इतका साठा असूनही ग्रामस्थांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा… सर्वेक्षणानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला यशाची खात्री; जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांचा दावा

वाघूर नदीवरील बेळी गावात असलेली पाणीपुरवठा योजना, तसेच मुर्दापूर धरणाजवळील पाणीपुरवठा योजना, पेठ भागातील विहीर याद्वारे ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळू शकते, तसेच शेळगाव बॅरेज येथून केलेली पाणीपुरवठा योजना निव्वळ वीज देयक थकल्याने बंद आहे. शेळगाव बॅरेजमध्ये चांगला साठा असून, तेथील योजना नशिराबाद शहरास पाणीपुरवठा करण्यास सक्षम आहे. थकलेले वीज देयक भरून पुरवठा सुरू करावा व ग्रामस्थांचे हाल थांबवावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to shortage of artificial water people of nashirabad led ghagar morcha under the leadership of ncp on tuesday afternoon in jalgaon dvr