धुळे – किरकोळ कारणावरून वाद घालून युवकाची हत्या केल्याप्रकरणी धुळ्याच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी तिघा भावांना आजन्म करावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे परिस्थितीजन्य पुराव्यासह केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
किरकोळ कारणावरून वाद घालून धुळ्यातील मिल परिसरात असलेल्या विद्युत नगरात राहणारे मयूर मच्छिन्द्र शार्दूल (३५), मनोज मच्छिन्द्र शार्दूल (३०) आणि मुकेश मच्छिन्द्र शार्दूल (२२) या तिघा भावांनी निखिल साहेबराव पाटील (२०) रा.विद्युत नगर, धुळे याच्यावर लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढविला. चार फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सव्वासात वाजता शासकीय दूध डेअरी रस्त्यावरील स्वराज जिमजवळ झालेल्या या हल्ल्यात निखिल पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत निखिलचा भाऊ दीपक साहेबराव पाटील याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घरगुती कारणावरून वाद घालून मयूर, मनोज आणि मुकेश या तीनही भावांनी निखिलवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने निखिलचा मृत्यू झाला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला. या तक्रारीवरुन पोलिसांनी शार्दूल बंधूंविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील यांनी या हत्या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज झाले. न्यायालयाने उभय पक्षाचा युक्तिवाद नोंदविताना परिस्थितीजन्य पुरावे आणि १२ साक्षीदार तपासले. दरम्यान, जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी युक्तिवाद केला. हल्ल्याचा घटनाक्रम, मृत निखिल पाटीलच्या शवविच्छेदनातून स्पष्ट झालेल्या त्याच्या अंगावरील खोलवरच्या जखमा आणि रक्तस्राव न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हा युक्तिवाद आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरण्यात आला.
मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी मयूर, मनोज आणि मुकेश या शार्दूल भावांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी दिली.
या खटल्यात मृत निखिल पाटील याचा फिर्यादी भाऊ दीपक पाटील, आई वंदना साहेबराव पाटील तसेच मामा योगेश संतोष पाटील आणि अनिल किशोर पाटील हे चौघेही फितूर झाले. या चौघांनी सरकार पक्षाला अपेक्षित सहकार्य केले नाही. – संजय मुरक्या (अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, धुळे)