नाशिक : दारणा समुहातील काही धरणांची जायकवाडीच्या पथकाने पाहणी केली असली तरी गंगापूर समुहातील जलसाठ्याची पाहणी करण्यास येणाऱ्या पथकाला मराठा आंदोलनाची झळ बसली. संभाजीनगरहून हे पथक येऊ न शकल्याने गंगापूर धरण समुहातील संयुक्त पाहणीचे काम रखडले. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी प्रगतीपथावर असली तरी काही धरणांची संयुक्त पाहणी बाकी आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित पथकाच्या देखरेखीत जायकवाडीसाठी पाणी सोडता येईल. त्यात आणखी कालावधी जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पाच टीएमसी पाणी वापरास परवानगी मिळाल्यास जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येणार नसल्याचा मुद्दा शासनस्तरावर मांडला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समुहातन ३३६० असे नाशिक व नगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने त्वरित पाणी सोडण्याचे आदेश दिले असले तरी नाशिक वा नगर जिल्ह्यातील धरणांमधून अद्याप विसर्ग होऊ शकलेला नाही. प्रशासकीय पातळीवर विसर्गाची तयारी करण्यात आली आहे. विसर्ग काळात गोदावरी व दारणा नदीकाठच्या भागातील पाणी घेणाऱ्या सर्व उपसा सिंचन योजनांचा विद्युत पुरवठा पिण्याच्या पाण्याच्या योजना वगळून २२ तास खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात हजार पुरुषांमागे ९१४ स्त्री मतदार; संख्या वाढविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन

२०१८ मध्ये विसर्ग करताना थेट गंगापूर धरणावर धडक देऊन शेतकऱ्यांनी विसर्ग थांबवला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. धरण परिसरात जमावबंदी लागू केली गेली असून गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, कडवा, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी यासह या धरणांच्या आवर्तन मार्गावरील नदीकाठच्या परिसरात पाच किवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईचा इशारा अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिला आहे.

हेही वाचा : नाशिक: भूमाफियांच्या विळख्यातून शाळा वाचवा, रचनाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

जायकवाडीचे पथक विसर्ग प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. तत्पुर्वी एका पथकाने दारणा समुहातील काही धरणातील जलसाठ्याच्या नोंदी घेतल्या. गंगापूर समुहातील धरणांची संयुक्त पाहणी व नोंदींचे काम अद्याप झालेले नाही. त्यासाठी जायकवाडीचे दुसरे पथक येणार आहे. संभाजीनगरसह नाशिक जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनामुळे ते नाशिकमध्ये येऊ शकले नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. हे पथक आल्यानंतर ती प्रक्रिया पार पडेल. याच पथकांकडून नद्यांवरील बंधाऱ्यातील जलपातळीचे अवलोकन होणार आहे. हे पथक आल्यानंतर पाहणीस एक-दोन दिवसांचा अवधी लागू शकतो. त्यानंतर संबंधितांच्या देखरेखीत विसर्ग केला जाणार आहे.

हेही वाचा : सेल्फी विथ मिट्टी अभियानामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची तारांबळ – छायाचित्रे संकेतस्थळावर टाकण्यासाठी धडपड

दरम्यान, पाणी सोडण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून विसर्गाऐवजी जायकवाडीच्या मृत साठ्यातील पाच टीएमसी पाणी वापरावे, अशी मागणी त्यांच्याकडून मांडली गेली आहे. विसर्गात २.६६३ टीएमसी (२६६३ दशलक्ष घनफूट) पाण्याचा अपव्यय होईल. मृतसाठ्यातील पाणी वापरास परवानगी दिल्यास अपव्यय टाळता येईल. यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याने विसर्गाचे भवितव्य तुर्तास दोलायमान आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik district inspection of dams to release water for jayakwadi dam delayed due to maratha reservation protest css