नाशिक – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीविषयी सर्वच राजकीय पक्षांना जाग येऊ लागली आहे. नाशिकमध्ये सर्वसामान्यांना गुंडांमुळे जगणे असह्य झाले असताना इतके दिवस सत्ताधारी भाजपचे आमदार, पदाधिकारीही निद्रिस्त होते. परंतु, महायुतीतील मित्रपक्षच गुन्हेगारीवरुन कुरघोडी करु लागल्याचे लक्षात येताच भाजपला जाग आली. पोलीस आयुक्तांची भेट घेणे, त्यांना गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सूचना करणे आणि सात दिवसात शहरातील गुन्हेगारी कमी झालेली असेल, असे आश्वासन दिले जात असतानाच गुंड पोलिसांना आणि राजकीय पक्षांना कोणतीही किंमत देण्यास तयार नसल्याचे दसऱ्याच्या दिवशी पहाटे पुन्हा एकदा दिसून आले.

जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत या वर्षी ४२ हत्यांची नोंद नाशिकमध्ये झाली आहे. दररोजची लुटमार, सोनसाखळी हिसकावणे, हाणामारी यासारख्या घटना तर वेगळ्याच. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीचा विषय सर्वप्रथम शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांनी संयुक्तपणे मांडला. त्यांच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला होता. परंतु, त्यानंतरही विशेष फरक पडला नाही. शहरात गुन्हेगारी कारवाया वाढतच राहिल्या.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत याच आठवड्यात महायुतीतील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली होती. पोलिसांना त्यांनी काही सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार पोलीस आता रस्त्यावर दिसतील, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, राज्याचे गृह खाते भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना भाजपचे नाशिकमधील तीनही आमदार वाढत्या गुन्हेगारीविषयी गुपचूप होते.

परंतु, नाशिककरांमधील वाढता रोष आणि मित्रपक्षाच्या मंत्र्यांनीच या विषयावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्यावर भाजपच्या तीनही आमदारांनी भुसे-पोलीस आयुक्त भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेत घेत त्यांना गुन्हेगारी रोखण्यासाठी साकडे घातले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची तीनही आमदारांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली.

या घडामोडींना २४ तासही पूर्ण होत नसताना दसऱ्याच्या पहाटे नाशिकरोड परिसर गुन्हेगारी कृत्याने हादरला. नाशिकरोड परिसरातील धोंगडेनगर, डावखरवाडीत दुचाकीने आलेल्या तीन जणांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. वाहनतळात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांच्या दसऱ्याच्या आनंदावर विरजण पडले. काहीही करा, पण नाशिकची गुन्हेगारी थांबवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) अतुल धोंगडे आणि कार्यकर्त्यांनी नुकसान झालेल्या रहिवाशांना धीर दिला.