जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढविण्यासाठी नागरी सहभाग महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येकाला आपले गाव, आपली सोसायटी, आपले नगर याचा नावलौकिक व्हावा असे वाटते. त्यासाठी मतदार सहभागाचा हा उपक्रम आगळावेगळा ठरणार आहे. त्यानुसार मतदानाच्या टक्केवारीनुसार सुवर्ण, रौप्य आणि कांस्य यापैकी एक फलक ती सोसायटी, त्या गावात लावण्यात येणार आहे. समूहाचा बहुमान होत असेल तर मतदानवाढीसाठी सामूहिक प्रयत्न होऊ शकतात, हा या संकल्पनेचा गाभा आहे.

या उपक्रमाचा प्रभाव वाढविण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने रोटरी क्लब, निवासी कल्याण संघटना आणि स्थानिक संस्थांसह विविध सामाजिक गटांकडून पाठिंबा मिळविला आहे. लोकशाही मूल्यवृद्धी करण्याच्या या भावनेला चालना देण्यासाठी आणि मतदानासाठी सामाजिक दबाव निर्माण करण्यासाठी मी मतदान केले, आम्ही सर्वांनी मतदान केले, या घोषवाक्याखाली वॉकथॉनसारखे समाजबांधणी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या आवाहनाला लायन्स क्लब, औद्योगिक संघटना, वैद्यकीय संघटना आणि अभियांत्रिकी संघटनांसह विविध संस्थांकडून पाठिंबा मिळत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : मद्यसाठा तस्करीतील हस्तकास नाशिकमध्ये अटक

या उपक्रमाबद्दल गोल्डसिटी, रोटरी क्लबचे सदस्य अमित आहुजा यांच्या म्हणण्यानुसार, असे फलक हे लोकशाही सहभागाचे चिरस्थायी प्रतीक म्हणून काम करतील, तसेच भविष्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना नागरी सहभागातील परिसराची बांधिलकी दर्शविणारेही ठरतील. रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सार्वत्रिक सहभाग सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर देताना व्यक्तिगत पातळीवरील सहभागाचे महत्त्व तेवढेच महत्वाचे असल्याचे या उपक्रमाबद्दलचे मत व्यक्त केले.

हेही वाचा : काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल

कसा असेल हा उपक्रम ?

ज्या वसाहती, गृहनिर्माण संस्था आणि गावे ७६ ते ८५ टक्के मतदान करतील, त्यांना कांस्य रंगाचे फलक त्यांना अभिमानाचे प्रतीक वाटावेत अशा ठिकाणी उभे केले जातील. जिथे ८६ ते ९५ टक्के एवढे मतदान होईल, अशा वसाहती, गृहनिर्माण संस्था आणि गावात रौप्य फलक लावला जाईल आणि जिथे ९६ ते १०० टक्के मतदान होईल अशा ठिकाणी सुवर्ण फलक लावला जाईल. हा उपक्रम केवळ व्यक्तिगत मतदानाला प्रोत्साहन देत नाही, तर लोकशाही प्रक्रियेवर सामूहिक मालकीची भावना वाढविण्यासाठीही महत्त्वाचा ठरेल, असे प्रशासनाचे मत आहे.